शिर्डी : ""केंद्रात बहुमत असूनही तुम्ही 370 कलम रद्द का करीत नाही, असा प्रश्न वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत विरोधी पक्षांचे प्रवक्ते विचारून आम्हाला धारेवर धरीत. भाजपने हे कलम रद्द करून दाखविले. "मोदीजी हैं तो मुमकीन हैं' असा संदेश त्याद्वारे दिला. आता "ये दिल मांगे मोअर' असे म्हणावेसे वाटते. लक्षात घ्या, लवकरच पाकव्याप्त काश्मीरवरही भारत कब्जा करणार आहे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसैन यांनी काश्मीरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
हुसैन यांनी आज येथे येऊन साईसमाधीवर चादर चढविली. नंतर द्वारकामाईत जाऊन माथा टेकवला. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, ज्येष्ठ नेते दिलीप संकलेचा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, गजानन शेर्वेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर तेथील सद्यःस्थितीबाबत विचारले असता ते म्हणाले, ""तेथील परिस्थिती सामान्य आहे. केवळ सात टक्के भागात अद्याप अडचणी आहेत. उर्वरित 93 टक्के काश्मीर शांत व सामान्य आहे.''
भाजपचे ज्येष्ठ नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपाबाबत व त्यानंतर पोलिस कारवाईकडे लक्ष वेधले असता हुसैन म्हणाले, ""न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कारवाई सुरू आहे. व्यक्ती म्हणून कोणी दोषी असेल, तर तिच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल.'' शब्बीर सय्यद, किरण बोऱ्हाडे, गणेश जाधव आदी उपस्थित होते.
ते तर तालिबान खान
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी "युनो'त केलेल्या वादग्रस्त भाषणाबाबत शाहनवाझ हुसैन म्हणाले, ""ते कसले इम्रान खान? ते तर तालिबान खान आहेत. अतिरेक्यांचे म्होरके असल्यासारखी भाषणे देतात. त्यांनी दिलेली अणुबॉम्बची धमकी म्हणजे ते वैफल्यग्रस्त झाल्याचे लक्षण आहे.''
|