यंदा साडेसात लाख टन साखरेचे उत्पादन घटणार कारण...

This year the production of sugar will decrease by 7.5 lakh tonnes
This year the production of sugar will decrease by 7.5 lakh tonnes

पुणे : कारखानास्तरावर साखरेच्या दरात गेल्या दोन वर्षांपासून वाढ झाली नसून, ३१ रुपये प्रतिकिलोच आहे. सध्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत सहा ते सात रुपये नुकसान होत आहे. केंद्र सरकारने साखरेचा दर प्रतिकिलो ३८ रुपये करावा, अशी मागणी साखर कारखान्यांनी केली आहे. तसेच, राज्य सहकारी बॅंक आणि जिल्हा बॅंकांनी इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी अर्थसाहाय्य केल्यास साखर उद्योग अडचणीतून बाहेर येईल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केले. 

राज्यातील साखर कारखान्यांकडे इथेनॉलची उत्पादन क्षमता १०८ कोटी लिटर्सची आहे. त्यापैकी ९९ कोटी लिटर्स उत्पादन होत आहे. साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाकडे वळल्यामुळे चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात साडेसात लाख टनांनी घट होइल, असा अंदाज आहे. राज्यात पाच हजार ८३७ कोटींचे १२९ इथेनॉल प्रकल्प मंजूर आहेत. त्यापैकी १८ कारखान्यांना ८७५ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. १२ कारखान्यांचे ५९६ कोटींचे कर्ज वितरण प्रलंबित आहे. २४ प्रकल्पांकडून १ हजार १४२ कोटींच्या कर्जासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तसेच, ७५ कारखाने आर्थिक निकषात बसत नाहीत. त्यामुळे तीन हजार २२१ कोटींचे कर्ज मिळण्यास अडचण येत आहे. बॅंकांनी कारखान्यांना अर्थसाहाय्य केल्यास हे प्रकल्प मार्गी लागतील. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत साखर संघ, बॅंका, ऑइल कंपन्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे, असे दांडेगावकर यांनी सांगितले. 

ब्राझील आणि थायलंड देशाचे इथेनॉल उत्पादन वाढविण्याचे धोरण आहे. ब्राझील येथील गाळप हंगाम एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात साखर निर्यात चांगली होइल, असे राष्ट्रीय सहकारी साखर साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. तर राज्यातून मुंबई बंदरातून साखर निर्यात करण्यास गुजरातच्या कांडला बंदराच्या तुलनेत जादा खर्च येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न साखर संघाकडून प्रयत्न सुरू आहेत, असे राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सांगितले. 

साखरेचा दर ३८ रुपये करावा 
साखरेचा दर ३१ रुपये प्रतिकिलो असून, उत्पादन खर्च ३८ रुपये आहे. त्यामुळे किमान ३८ रुपये दर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे. साखरेच्या दरात वाढ करण्यात यावी, याबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार लवकरच केंद्र 
सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत, अशी माहिती साखर महासंघाकडून देण्यात आली. 

राज्यात ६१० लाख टन उसाचे गाळप 
राज्यात १८२ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू असून, यंदा ९२५ लाख टन उसाचे गाळप होइल असा अंदाज आहे. आजअखेर ६१० लाख टन उसाचे गाळप झाले असून, ६०.३३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच, साखरेच्या उताऱ्याचे प्रमाण ९.८८ टक़के इतके आहे. सरासरी उताऱ्यात अर्ध्या टक़क्यांनी घट झाली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मार्चअखेरपर्यंत गाळप संपेल. तसेच, नगर जिल्ह्यात एप्रिलअखेर तर मराठवाड्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप हंगाम सुरू राहील, अशी माहिती साखर संघाकडून देण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com