येथे फोन करा अन् दारात भाजीपाला मिळवा!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वकाही ठप्पच झाल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे पडून राहत आहेत. त्यावर तोडगा म्हणून कृषी विभाग व महापालिका, जिल्हापुरवठा विभागातर्फे शेतमाल, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून ग्राहकांना थेट भाजीपाला पुरविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळणार असून, ग्राहकांनाही ताजा भाजीपाला रास्त दरात मिळणार आहे. 
जनता कर्फ्यूनंतर आजतागायत भाजीपाल्यांचा तुटवडा व्यापारी, दलालांनी जाणीवपूर्वक निर्माण केला आहे. त्यामध्ये व्यापारी आहे तितका शेतमाल, भाजीपाला चढ्या भावाने विक्री करत होते; मात्र एकीकडे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना भाजीपाला विकावा लागत होता, तर ग्राहकांनाही अधिकचे पैसे देऊन भाजीपाला खरेदी करावा लागत होता. ही साखळी मोडून काढण्यासाठी कृषी विभागाने हा निर्णय घेतल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. 

म्हणून हा निर्णय 
जाधववाडीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व फळे यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. समितीत फळे व भाजीपाला घेण्यासाठी ग्राहक, व्यापारी यांची एकच गर्दी होते. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. यामुळे कोरोना व्हायरसचा धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच बहुतांश दलाल शेतकऱ्यांकडून अल्पभावात शेतमाल, फळे, भाजीपाला घेऊन तो शहरवासीयांना तब्बल दुप्पट तर फळे तिप्पट भावाने विकत आहेत. यामध्ये शहरातील सर्वसामान्यांचे आधीच आर्थिक गणित बिघडले असल्याने चढ्या भावाने भाजीपाला खरेदी करून शकत नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांनाही कवडीमोल भावाने भाजीपाला व्यापारी, दलालांच्या घशात घालावा लागत होता. त्यामुळे बाजार समितीमधील गर्दी कमी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ), जिल्हा पुरवठा अधिकारी, महानगरपालिका यांनी एकत्र येऊन शेतकरी गटामार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याचे एसएओ डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. 

महापालिकेचे अधिकारी जोडणार सोसाट्यांना 
औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गटांनी भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विकण्याची इच्छा कृषी विभागाकडे व्यक्त केली होती. दरम्यान, भाजीपाला उत्पादक शेतकरी गटाची माहिती कृषी विभागाने महापालिकेला दिली असून, महापालिकेचे अधिकारी अशा शेतकरी गटांना मोठ्या कॉम्प्लेक्स सोसायटीशी जोडून देणार आहेत. भाजीपाला व फळे विक्रीच्या ठिकाणी गर्दी टाळावी म्हणून ते शेतकरी गट विशिष्ट वजनाच्या चार ते पाच भाज्यांची एक थैली करणार आहेत. शेतकरी गट कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीचे अध्यक्ष/ सचिव यांना रोज किती भाजीपाला लागणार याची माहिती घेऊन या भाजीपाल्याच्या पिशवी अध्यक्ष किंवा सचिव यांना पैसे घेऊन सुपूर्द करणार आहेत. काही शेतकरी गटांनी भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधलेला आहे. 

यांना करा संपर्क 
जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात शेतकरी गट आहेत. अशा गटांनाही आपला भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करायचा असेल तर त्यांनी कृषी विभागाच्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क करावा; तसेच आपले तालुका पातळीवरील कृषी अधिकारी, आत्माचे एटीएम, बीटीम यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. मोटे यांनी केले आहे. अनिलकुमार हदगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी औरंगाबाद मो. ९४२१३१६०९३, विश्वास जाधव, मंडळ कृषी अधिकारी, ९८३४६३९०८९/९४२२९०५१९२, रंगनाथ पिसाळ, कृषी सहायक ८२०८६६५३४४/९४०४६८०५०८ यांच्याशी संपर्क करता येणार आहे. 

वसाहतवासीयांनो भाजीपाल्याची नोंदणी करा 
मोठ्या वसाहतीमध्ये शेतकरी गट भाजीपाला, फळे विक्रीसाठी तयार आहेत. शेतकरी गटांची यादी मोबाईल क्रमांकासह दिली आहे. कृपया या शेतकरी गटाशी संपर्क करा; तसेच आजूबाजूच्या अपार्टमेंट यांनी कळवा; तसेच अपार्टमेंटमधील सचिव/अध्यक्ष यांनी शेतकरी गटाशी संपर्क करून किती भाजीपाला लागेल हे सांगावे. एकदम थोडा भाजीपाला लागत असेल तर त्यांना गावाकडून औरंगाबाद येणे परवडणार नाही हे लक्षात घ्यावे. भाजीपाला घेताना सोशल डिस्टन्स ठेवा, असेही डॉ. मोटे यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com