औरंगाबाद -शहरात शुक्रवारपासून (ता. दहा) जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन येथील काही कंपन्या सुरू होत्या. चारही एमआयडीसीतील चारशेहून अधिक कंपन्या सुरू राहणार असल्याची माहिती उद्योग संघटनांनी दिली. यामुळे उद्योगजगतासह कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परवानगी कायम
शहरालगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये अत्यावश्यक सेवा, फार्मा उद्योगांना पूर्वीची परवानगी कायम आहे, तसेच काही उद्योगांना अंतर्गत उत्पादन सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत पहिल्या दिवशी या उद्योगांमध्ये जाणाऱ्यांना फारशी अडचण जाणवली नाही. परिणामी उद्योग बंद ठेवण्याची वेळही आली नाही. प्रशासनाने निर्यात, कंटिन्यू प्रोसेस, अत्यावश्यक सेवा व फार्मा उद्योगांना पूर्वीप्रमाणे परवानगी कायम ठेवली. तसेच ज्या उद्योगांना कंपनीच्या आत कामगारांना थांबवून उत्पादन करावयाचे असेल त्याला हरकत घेणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे उद्योगांची अडचण बऱ्यापैकी दूर झाली आहे. शुक्रवारी औद्योगिक वसाहतीत साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे अनेक उद्योग बंद होते. मात्र अत्यावश्यक सेवा, फार्मा, कृषीआधारित उद्योग सुरू होते. त्यात काम करणाऱ्या कामगारांकडे पास होते. त्यामुळे येण्या-जाण्यास बहुतेक जणांना अडचण आली नसल्याचे उद्योजक संघटनांनी सांगितले.
महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार
उत्पादन सुरू
महापालिका हद्दीबाहेर अत्यावश्यक सेवा, कृषीआधारित उद्योग तसेच फार्मा उद्योगांची संख्या ३०० च्या आसपास आहे. लघु, मध्यम तसेच काही मोठ्या उद्योगांनी कंपनीच्या आत आपले कामगार, कर्मचारी ठेवून उत्पादन सुरू ठेवले आहे. मात्र त्यांचा नेमका आकडा किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. १८ जुलैपर्यंत लॉकडाउन असून या काळात उत्पादन सुरू राहील. त्यानंतर हा माल ऑर्डरप्रमाणे पाठविण्यात येईल, अशी माहिती ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी दिली. प्रशासनाने हा शेवटचा लॉकडाउन असेल, असे आधीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे सर्वच उद्योग संघटनांनी या जनता कर्फ्यूला पाठिंबा दिलेला आहे. कर्मचाऱ्यांची ने-आण, सुरक्षिततेचे नियम पाळले जात असल्याचेही श्री. हंचनाळ यांनी नमूद केले.
संपादन ः प्रवीण मुके
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.