"आम्ही यापुढे लॉकडाउनचे अनुसरण करणार नाही ! बस म्हणजे बस !!' 

Jalil_Thackarey.
Jalil_Thackarey.

औरंगाबाद : राज्यात सध्या कोरोनाच्या संसर्गाची स्थिती बिकट बनली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व घटकांचा विचार करुन निर्णय घेण्याबाबत सर्वपक्षीयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. मुख्यमंत्री व डॉ. तात्याराव लहाने यांच्या मते लॉकडाउन करावा. एक-दोन दिवसांत किंवा पुढील आठवड्यात लॉकडाउनचा निर्णय होणार, असे समजते. मात्र औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या फेसबुकवरून पोस्ट केले, की "आम्ही यापुढे लॉकडाउनचे अनुसरण करणार नाही! बस म्हणजे बस!!' यामुळे लॉकडाउनला एमआयएमचा विरोध राहणार, हे अधोरेखित झाले आहे. 

इम्तियाज जलील यांनी फेसबुकवर पोस्ट केलेला संदेश 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. 

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आठ दिवस कडक निर्बंध असले पाहिजेत हे माझं मत आहे. सर्वांना थोडी कळ सोसावी लागेल. मी लसीचे दोन डोस घेतले तरीही माझ्या शरीरात अँटीबॉडिज नाहीत, मग लस खरंच काम करते आहे का हा मोठा प्रश्नच आहे. पुढच्या दोन दिवसात आपण प्लान करू आणि कडक निर्बंध करायचा विचार करू. गरज पडली तर कडक निर्बंध लावावा लागेल. सगळे व्यापारी आपले आहेत, आपल्याला त्यांचा पण विचार करावा लागेल. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांचा विचार करा, तुम्ही तो केला पाहिजे. तुम्ही तुमचा प्लान लोकांसमोर आणा आणि त्यांना तो समजावून सांगा. त्यानंतर निर्णय घ्या. 

अशोक चव्हाण म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. सरकारची भूमिका, निर्णयाबाबतचा अपप्रचार व गैरसमज टाळण्यासाठी तसेच वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोचावी यासाठी निवडक मंत्री नियुक्त करून त्यांनी नियमित ब्रिफिंग करावी. महाराष्ट्राने चाचण्या वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढणे स्वाभाविक आहे, ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. 

डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, 24 तास रुग्ण वाढत आहेत. मला असं वाटतं 14 दिवस लॉकडाउन हाच एक उपाय आहे. 

लॉकडाउनचा निर्णय दोन दिवसांत किंवा पुढील आठवड्यात होणार आहे. मात्र आतापासूनच एमआयएमने लॉकडाउनला विरोध करायला सुरवात केली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी "आम्ही यापुढे लॉकडाउनचे अनुसरण करणार नाही! बस म्हणजे बस!!' अशा शब्दांत फेसबुकवरून लॉकडाउनला तीव्र विरोध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com