रस्ता न पोहचलेल्या शेतवस्तीवर रस्ता देण्यासाठी पोहचले तहसीलदार...

Sakal
Sakal

पाचोड (औरंगाबाद): स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही तांडे, वाडया, शेतवस्त्यांवर दळणवळणासाठी पक्के रस्ते नसल्याचे चित्र आहे. बारमाही विद्यार्थांसह वस्तीवरील नागरिकांना रस्त्यासाठी जिवघेणा संघर्ष करावा लागत आहे, वाड्या- वस्त्यांवरील नागरिकांच्या हाकेला कुणीच प्रतिसाद देत नसल्याने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेरगाव (ता.पैठण) येथील गाडेकर व उबाळे वस्तीवरील ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. १५) ग्रामपंचायतीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने पैठणचे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यानी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले.

आश्वासने हे केवळ देण्यासाठी असले तरी पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके मात्र 'त्या' आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी पाणंद रस्त्याने दोन किलोमिटर पायी चालत चिखल तुडवत बुधवारी (ता.२७) थेरगाव (ता.पैठण) येथील गाडेकर -उबाळे वस्तीवर धडकले, त्यांनी प्रथमतःच  तेथील ग्रामस्थांसोबत चर्चा केल्याने ग्रामस्थ गहिवरले.

थेरगाव येथील गाडेकर -उबाळे कुटुंबिय गावांपासून दोन किलोमीटर अंतरावर वस्ती करून राहतात. येथील दीडशेच्या जवळपास शाळकरी मुले तर उर्वरित महिलां-पुरुष शाळा व विविध गरजांसाठी गावांत ये- जा करतात. पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यानंतरही हा रस्ता पाणंद रस्ता असल्याने आठ महिने दलदलीचा राहून त्यांचा व गावांचा संपर्क तुटतो. रस्त्याच्या मध्यभागी नदी असल्याने व त्यातून पाणी वाहत असल्याने सर्वाना वाहत्या पाणी व चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे जिवित्तहानीची प्रत्येकाना धास्ती लागून राहते.

अनेक वर्षांपासून या वस्तीवरील नागरिक पक्क्या रस्त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु कोणीही गांभीर्यानेे घेत नसल्याने या वस्तीवरील नागरिकांनी शुक्रवारी (ता. १५) रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, नागरिकांच्या या निर्णयानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी या बाबींची गांभीर्याने दखल घेत तहसिलदारांस 'त्या' वस्तीवर पाठवून लेखी आश्वासन दिले. तेव्हा नागरिकांनी बहिष्कार मागे घेतला. निवडणूक झाली अन् आश्वासने संपली असे म्हटले जात असले तरी प्रथमतःच अन् पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी मात्र 'त्या' वेळी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी पावले उचलली.

पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके बुधवारी (ता.२७) दिला शब्द खरा करण्यासाठी पाचोडचे मंडळ अधिकारी इंदेलसिंग बहुरे,तलाठी सुनिल मोळवणे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांच्यासह दोन किलो मिटर चिखलातून पायपीट करीत सदर शेतवस्तीवर पोहचले. वस्तीवरील बापुराव गाडेकर, शिवाजी उबाळे, विष्णु गाडेकर, पांडुरंग गाडेकर,मनोहर गाडेकर, शिवाजी पठाडे, कल्याण निर्मळ, जनार्धन उबाळे यांचेशी चर्चा करून त्यांची समस्या जाणून घेतली.

यावेळी प्रथमतःच एखाद्या अधिकाऱ्याने वस्तीवर येवून आत्मीयेतेने वस्तीवरील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्याने वस्तीवरील नागरिकांच्या आनंदाला आकाश ठेंगणे पडल्याचे पाहवयास मिळाले. यावेळी उपस्थितांनी केलेलेल्या अर्ज, निवेदने दाखवली व सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे सांगून आमची लहान मुलं शिक्षणासाठी नदीच्या पाण्यातून वाट काढत गाव गाठतात तेव्हा घरी येईपर्यंत आमच्या मनात चिंता लागून असते. रस्त्या अभावी चिखल, पाण्याशी दोन हात करून विद्यार्थ्यांना पाण्यातून प्रवास करून शाळेत जावे लागत असल्याची शोकांतिका स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीही आम्हास भेडसावते, त्यामूळे पारतंत्र्यात असल्यागत होते, अशी कैफियत मांडली. तेव्हा तहसिलदार शेळके यांनी पाणंद रस्त्याऐवजी शिवरस्ता अधिक सोईस्कर होईल.

ग्रामस्थांनी त्यासाठी लोकसहभागातून थोडेफार हातभार लावावा, उर्वरित शासकीय स्तरावर मदत करून शिवरस्ता थेट वस्तीपर्यंत मोकळा करून दिला जाईल.यासाठी मग्रारोहयो अथवा शिव रस्त्याचा लाभ घेता येईल, असे सांगून ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची सर्व प्रक्रीया पार पडल्यानंतर कार्यवाहीस प्रारंभ करू". असे आश्वासन ऐकताच नागरिकांचे चेहरे आनंदाने उजळले.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com