सत्तारांच्या नाराजीनाट्यानंतर जिल्हा परिषदेत काय होणार ? 

सत्तारांच्या नाराजीनाट्यानंतर जिल्हा परिषदेत काय होणार ? 

औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसला अध्यक्षपद देण्यास विरोध करत आपल्या समर्थक सदस्यांना सोबत घेतले होते. मागील काही दिवसांपासून हे सदस्य त्यांच्या संपर्कात आहे. आता शनिवारी दुपारुन होणाऱ्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सत्तारांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टोकाचा विरोध 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अध्यक्षपद देण्यास टोकाचा विरोध केला आहे. त्यांच्या या खेळीमुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेत निवडणुकीत चुरस निर्माण होऊन नंतर राडा झाला होता. यानंतर रात्री आणि आज सकाळी राजकीय घडामोडी घडून सत्तारांनी राजीनामास्त्र बाहेर काढले होते. आता अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार हे काय करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अध्यक्षासाठी आज नव्याने मतदान प्रक्रिया 

अभूतपूर्व गोंधळामुळे शुक्रवारी (ता.तीन) तहकूब करावी लागलेली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची मतदान प्रक्रिया शनिवारी (ता.चार) पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या परिसरात गर्दी होणार नाही याची पुरेपूर खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाण्याची शक्‍यता आहे. 
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी सभा बोलावण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, जिल्हा परिषद सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. बोट वर करून मतदान घेण्यात आले; मात्र मतांची मोजणी होऊ शकली नाही. स्वाक्षरी घेताना एका सदस्याच्या मतामुळे निर्माण झालेल्या सभागृहातील गोंधळामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पालवे यांनी ही सभा तहकूब केली आणि शनिवारी (ता.चार) सभा घेण्यात येईल, असे जाहीर झाले होते. 

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पालवे यांनी सांगितले, की अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार तर उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सुरवातीला अध्यक्षपदासाठी क्रमाने तिन्ही उमेदवारांसाठी मतदान करून घेतले. बोट वर करून मतदान घेतले जात होते. त्यात एका महिला सदस्याने एका उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर त्यांच्यासाठी बोट वर केले; मात्र मिनिटाभरानंतर पुन्हा खाली केले.

ज्यांनी मतदान केले त्यांच्या नियमाप्रमाणे स्वाक्षऱ्याही घेण्यात येत होत्या. त्यावेळी ज्या उमेदवारासाठी बोट वर केले होते त्या महिला सदस्याने त्या उमेदवारासाठी स्वाक्षरी करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे एका गटाकडून त्यांचे मत ग्राह्य धरा तर दुसऱ्या गटाकडून ग्राह्य धरू नका अशी ओरड सुरू झाली आणि गदारोळ वाढत गेला. अशा गोंधळाच्या परिस्थितीत वैध-अवैध कसे ठरवणार यासाठी सभा तहकूब केली आहे. मतदान घेणे सुरू होते; पण ते मोजून जाहीरच केले नाहीत. शनिवारी तहकूब सभा होईल त्यावेळी मतदानाची प्रक्रिया नव्याने घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जे उशिरा आले किंवा गैरहजर त्यांना मतदान करू द्यायचे किंवा नाही हे कायदेशीर बाबी तपासून ठरवले जाईल असे सांगितले. आज शनिवारी अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी प्रक्रीया पार पडणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com