लष्करी अळीग्रस्त मका खाल्ल्याने 15 जनावरांचा मृत्यू

लष्करी अळी
लष्करी अळी

करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता. सहा) झालेल्या दोन दुभत्या गायींच्या मृत्यूनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


या घटनेने वाहेगाव (देमणी) येथील शेतकऱ्यांची भीतीने गाळण उडाली आहे. मागील एक महिन्यापासून येथे दिवसाआड एक-दोन जनावरांचा पोट फुगून मृत्यू सुरू होता. यात दुभत्या व गाभण गायींसोबत बैलांही मृत्यू झाला. मात्र, पाऊस नसल्याने कुठले तरी गवत किंवा किडा खाल्ल्याने पोट फुगून जनावरे दगत असतील म्हणून सुरवातीला कोणीच लक्ष दिले नाही. किंबहुना आपल्याच नजरचुकीच्या वेळी जनावरांच्या काहीतरी खाण्यात आले असेल. त्यामुळे जनावर दगावले की कुठलाही पंचनामा किंवा शवविच्छेदन न करता जवळच्याच एखाद्या ओढ्यात ते जनावर खड्डा करून बुजवणे सुरू होते. दरम्यान, शनिवारी (ता.सात) गावातील एकनाथ शिंदे यांच्या चार दुभत्या गाईंना पोटफुगीची लागण झाली होती. श्री. शिंदे यांनी तत्काळ एका खासगी डॉक्‍टरांस पाचारण केले असता दोन गाई वाचविण्यात यश आले. तथापि,
दोन गाई यात मृत्युमुखी पडल्या. या गाईंचा विमा व जास्त रकमेचे नुकसान झाल्याने श्री. शिंदे यांनी तलाठी व पशुवैद्यकीय डॉक्‍टरांकडून पंचनामा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी (ता. आठ) तलाठी सरिता पाटील यांनी मृत दोन गाईंचा पंचनामा केला. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी, पशुधन विकास अधिकारी डॉ. डिघुळे व पशुधन पर्यवेक्षक ए. पी. अवकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन शवविच्छेदन केले असता दोन्ही गाईंचा मृत्यू विषारी औषधीयुक्त मका खाण्यात आल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी श्री. जोशी यांनी मकाचे ताट व कणीस याचा नमुना ताब्यात घेतला असून तो पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या सतर्कतेमुळे जनावरांच्या मृत्यूचे कारण समजू शकल्याने आता गावातील इतर शेतकरी तरी किमान ही अपरिपक्व अतिऔषध फवारणीची मका खाऊ घालणार नाही. त्यामुळे आता इतर जनावरांचा तरी मृत्यू होणार नाही.

गावावर दुहेरी संकट
याच वाहेगाव देमणीतील ग्रामस्थांनी मागील चार वर्षांपासूनच्या सततच्या दुष्काळाला कंटाळून 23 जुलै रोजी एकत्र येत संपूर्ण गावातील पिके नांगरून टाकल्याची घटना घडली होती. याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. आता याच गावातील शेतकऱ्यांनी कशाबशा जगविलेल्या मकाची वाढ न झाल्याने मका जनावरांना खाऊ घातल्या गेल्याने येथील शेतकऱ्यांचे उरलेसुरले आवसान गळाल्याचे चित्र आहे.

यांनी गमावली जनावरे
एकनाथ शिंदे यांच्या दोन गाईंसोबतच मागील महिन्याभरात लक्ष्मण शिंदे (2 गाई), पद्माकर शिंदे (1 गाय), बबन शिंदे (2 गाई), प्रदीप शिंदे (1 गाय, 1 बैल), प्रभाकर तोगे (1गाय), सांडू शिंदे (1 गाय), विकास शिंदे (1 गाय), कृष्णा शिंदे (1 गाय) व भगवान शिंदे यांची बैलजोडी मृत पावली आहे.

विषारी द्रावण
याबाबत डॉ. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अपूर्ण अवस्थेतील मका जास्त प्रमाणात दिल्यास येथील मकावर विषारी औषधीचे द्रावण आढळून आल्याने हा मृत्यू झाल्याचे सांगितले. असे गवत खाल्ल्यानंतर तासाभरातच जनावरं फुगतात व श्वास घेण्याची अडचण निर्माण होऊन तत्काळ मरतात. त्यामुळे त्यांनी खालीलप्रमाणे काळजी व खबरदारी घेऊन आपल्या जनावरांचा सांभाळ करावा असे आवाहन केले आहे.

अशी घ्या काळजी :
- शक्‍यतोवर वाळलेला चारा खाऊ घाला.
- असे शक्‍य नसल्यास किमान ओला मकाची कापणी केल्यानंतर दोन दिवस उन्हात ठेवा व जनावरांना एकदम न देता थोडा-थोडा टप्प्याटप्प्याने खायला द्या.
- फऱ्या व इतर संसर्गजन्य आजारांचे लसीकरण करून घ्या.
- गोचीड व गोमाशांचे निर्मूलन करून वेळोवेळी जंतनाशक औषधींचा वापर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com