Gram Panchayat Election : आष्टीत शेवटच्या दिवशी अडीच हजार अर्ज दाखल

ग्रामपंचायत निवडणूक; एकूण ३ हजार ९६१ अर्ज; सरपंचपदाच्या ७४५ अर्जांचा समावेश
Gram Panchayat Election : आष्टीत शेवटच्या दिवशी अडीच हजार अर्ज दाखल

आष्टी : जिल्ह्यात सर्वाधिक १०९ ग्रामपंचायतींची निवडणूक असलेल्या आष्टी तालुक्यात ऑनलाइन-ऑफलाइनच्या घोळामुळे अर्ज प्रक्रियेस विलंब झाला होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी (ता. २) विक्रमी २ हजार ४७६ अर्ज दाखल झाले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने अर्ज स्वीकारणे सुरू ठेवून सर्व उमेदवारांचे अर्ज जमा करून घेतले. तालुक्यात सरपंच पदासाठी ७४५, तर सदस्यपदासाठी ३ हजार २१६ असे एकूण ३ हजार ९६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात तालुक्यातील तब्बल १०९ ग्रामपंचायती असून एकूण ९२१ सदस्य व १०९ सरपंच निवडले जाणार आहेत. लोकनियुक्त सरपंच निवडीमुळे इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. सुरुवातीला ऑनलाइन अर्ज भरायचे होते. परंतु सोमवार (ता. २८) ते गुरुवार (ता. एक) यादरम्यान चार दिवस राज्य निवडणूक आयोगाची वेबसाइट सर्व्हर डाऊनमुळे वारंवार बंद पडत होती. त्यामुळे अर्ज भरण्याचा खोळंबा होऊन अंदाजे २० टक्केही उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज भरणे पूर्ण झालेले नव्हते.

तीन दिवस रात्ररात्र थांबूनही मोठ्या संख्येने उमेदवारांचे अर्ज भरणे बाकी होते. सोमवारी (ता. २८) सरपंच पदासाठी शून्य तर सदस्य पदासाठी १, मंगळवारी (ता. २९) सरपंच पदासाठी ४२, सदस्य पदासाठी ७७, बुधवारी (ता. ३०) सरपंच पदासाठी ६६, सदस्य पदासाठी २२९ अर्ज दाखल झाले. या तीन दिवसांत सरपंच पदासाठी १०८ व सदस्यपदासाठी ३०७ असे एकूण ४१५ अर्ज दाखल झाले होते. तर गुरुवारी (ता. एक) सकाळी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय झाल्यानंतर त्या दिवशी सरपंचपदासाठी १९१ व सदस्यपदासाठी ८७९ अर्ज आले होते.

त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास उमेदवार व समर्थकांची अक्षरशः झुंबड उडाली. एमआयडीसी रस्त्यावरील तंत्रशिक्षण महाविद्यालयामध्ये ही व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. दोन) या ठिकाणी सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने रात्री नऊ वाजेपर्यंत प्रशासनाने ही प्रक्रिया राबवून सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेतले. आता उमेदवारांचे लक्ष छाननीकडे लागले आहे.

सुनील यादव निवडणूक निरीक्षक

आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत आष्टीचे निवडणूक निरीक्षक म्हणून अंबाजोगाईचे अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (ता. तीन) याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.

ऑफलाइनचा निर्णय झाल्यानंतर गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक मोठ्या संख्येने आले होते. प्रशासनाने शेवटच्या दिवशी वेळ वाढवून देत रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारले व ही प्रक्रिया पूर्ण केली.

- विनोद गुंडमवार, तहसीलदार, आष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com