हिंगोली जिल्ह्यातील २९ हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

file photo
file photo

हिंगोली : जिल्‍ह्यात मागच्या वर्षी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवेळी पावसाने पिकाचे नुकसान झाले. यात जवळपास २९ हजार शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. आता उर्वरित शेतकऱ्यांना २० कोटी ७५ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनातर्फे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. तसेच दोन टप्प्यांत निधी वितरीत करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला होता. 

२० कोटी ७५ लाखांची मागणी

मात्र, तरीही जवळपास २९ हजार शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती तहसील कार्यालयाने वरिष्ठांकडे पाठविली होती. त्‍याप्रमाणे २० कोटी ७५ लाख ३० हजार २०० रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली. 

सेनगाव तालुक्यासाठी चार कोटींचा निधी

यामध्ये हिंगोली तालुक्‍यातील पाच हजार १७४ शेतकऱ्यांसाठी चार कोटी ८६ लाख ९८ हजार रुपये, कळमनुरी तालुक्‍यातील सात हजार ८६८ शेतकऱ्यांसाठी सहा कोटी १७ लाख ३३ हजार पाचशे रुपये, सेनगाव तालुक्‍यातील चार हजार २८८ शेतकऱ्यांसाठी चार कोटी ५२ लाख ४३ हजार नऊशे रुपयांची आवश्यकता होती. 

औंढा तालुक्यासाठी दोन कोटीचा निधी

तसेच औंढा नागनाथ तालुक्‍यातील सहा हजार ४१२ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. तसेच यासाठी दोन कोटी ८० लाख १९ हजार सातशे रुपये, तर वसमत तालुक्‍यातील पाच हजार १६० शेतकऱ्यांसाठी तीन कोटी ३८ लाख ३५ हजार शंभर रुपयांची आवश्यकता होती. 

आयुक्‍त स्‍तरावर वितरीत करण्यास मान्यता

राज्य शासनाने हा निधी विभागीय आयुक्‍त स्‍तरावर वितरीत करण्यास मान्यता दिली. हा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. त्‍यानंतर निधी तहसील कार्यालयाकडे वर्ग केला जाणार आहे. अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

निधी तहसील कार्यालकडे वर्ग केला जाणार

ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. त्‍यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्प्यातील निधीची शासनातर्फे भरपाई देण्यात आली. आता उर्वरित शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यात २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो तहसील कार्यालकडे वर्ग केला जाणार आहे. त्‍यानंतर शेतकऱ्यांना वाटप केले जाणार असून २९ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
-चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्‍हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com