
चाकूर(जि.लातूर) : हमीभावाने विक्री केलेल्या हरभऱ्याचे पैसे दोन महिन्यांपासून नाफेडकडून मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. चाकूर, आटोळा येथील केंद्रांवर तीन हजार ३०० शेतकऱ्यांनी हरभरा विक्री केली असून, त्यापैकी ३३० शेतकऱ्यांचे एक कोटी चाळीस लाख थकले आहेत.
येथील खरेदी विक्री संघाकडून नाफेडअंतर्गत हमीभावाने हरभरा खरेदी करण्यात आली. हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल चार हजार ८७५ रुपये हमीभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली. पैसे तातडीने मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, दोन महिने उलटले तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. अशीच स्थिती आटोळा येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या केंद्रांत हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांची आहे.
कंपनीने ४५० शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केली आहे. याठिकाणी बारदाने उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः बारदान्याची खरेदी करून हरभरा विक्री केला. दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतही बँक खात्यावर पैसे जमा होत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वारंवार खरेदी केंद्राकडे चकरा मारून पैसे कधी येतील, यासाठी शेतकरी विचारणा करीत आहेत. तातडीने पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आटोळा येथे जूनमध्ये हरभऱ्याची विक्री केली आहे. दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. विचारणा केल्यास पैसे जमा होतील, असे फक्त आश्वासन दिले जात आहे. शेतकऱ्यांना सध्या अनेक आर्थिक अडचणी असून, तातडीने पैसे जमा करावेत.
- मधुकर नीला, शेतकरी, कबनसांगवी
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.