Video : कृषी अर्थव्यवस्थेला धक्का, परंतु शासन सकारात्मक

file photo
file photo

परभणी : लॉकडाउनमुळे कृषी क्षेत्राची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कृषी अर्थव्यवस्थेला धक्का असला तरी सुदैवाने केंद्र आणि राज्य शासन शेती आणि संबंधित व्यवसायांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेत आहे. शासनाचा कृषी विभाग व कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेत आहेत. विद्यापीठाच्या वतीने उपलब्ध बियाणे शेतकऱ्यांपर्यंत जाईल याची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

लॉकडाउनमुळे कृषी अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. फळे, भाजीपाला विक्रीची व्यवस्था कोलमडून गेली आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झालेल्या अवस्थेत असल्याने त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी ‘सकाळ’शी संवाद साधून शेतकऱ्यांना धीर दिला आहे. डॉ. ढवण पुढे म्हणाले, ‘‘शासनाने शेती संबंधित शिथिलता देऊन सकारात्मक निर्णय घेतला आहे. यानुषंगाने कृषी विद्यापीठे, कृषी विभाग व इतर कृषी संबंधित संस्था यांच्यात समन्वय असून खरीप हंगामात कृषी निविष्ठांचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. अशा संकट काळात कृषी विद्यापीठाची एक जबाबदारी आहे. येणाऱ्या खरीप हंगामासंदर्भात जे काही विद्यापीठाचे तंत्रज्ञान, बियाणे हे विद्यापीठ कृषी मेळावे, चर्चासत्रे यांच्या माध्यमातून हस्तातंरीत करीत असते, त्यास यंदा फाटा देऊन प्रसार माध्यमांच्या व इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न आहे.

बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचविले जाणार

गतवर्षीपासून कृषी विद्यापीठ जिल्हा स्तरावर बियाणे विक्री करत आहे. यंदाही कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून विक्री व्यवस्था उभारून उपलब्ध बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचविले जाणार आहे. बियाणे विक्रीची व्याप्ती वाढवली जाईल. शासन, महाबीज आणि विद्यापीठ यांच्यात समनव्य असून बियाणांचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे विद्यापीठाच्या सतत संपर्कात आहेत. त्यांनी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय साधून  खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या विद्यापीठाच्या वतीने  ऑनलाइन सुविधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक, कीड व्यवस्थापन, बाजारपेठ आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.’’

हेही वाचा - धक्कादायक : परभणी आढळला कोरोना बाधीत पहिला रुग्ण

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था
कोरोना हे संकट असले तरी याकडे उत्पादकांनी संधी म्हणून पाहावे. फळे, भाजीपाला उत्पादकांनी गटा-गटांनी एकत्र येत मोठ्या शहरात ग्राहकांपर्यंत उत्पादन पोचवावे. अशा विक्री व्यवस्थेतून दलाल हद्दपार होणार आहेत. भाजीपाला, फळे यांची थेट विक्री व्यवस्था निर्माण होत असल्याचे डॉ. ढवण म्हणाले.

ऑनलाइन अभ्यासवर्ग
लॉकडाउन काळात कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आपापल्या घरी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ नये यासाठी विद्यीपाठाने ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यास प्रतिसाद मिळत असून भविष्यात ही मोठी उपलब्धी ठरणार असल्याचे डॉ. ढवण म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com