मराठवाड्यात कृत्रिम पावसाची 'ट्रायल'

मराठवाड्यात कृत्रिम पावसाची 'ट्रायल'

औरंगाबाद : राज्य शासनाने नऊ ऑगस्टपासून दुष्काळग्रस्त मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग हाती घेतला; मात्र, तो प्रयोग नसून 'ट्रायल' असल्याचे समोर आले आहे. सोलापूरमध्ये असलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे (आयआयटीएम) विमान उसनवारीवर आणून ही 'ट्रायल' घेण्यात आली. या 'ट्रायल'मध्येही पाऊस पडलेला नाही.
त्यामुळे तेही विमान माघारी परतले. कृत्रिम पाऊस पडणारे खरे विमान अद्याप सौदी अरेबियातच आहे. प्रयोगासाठीचे हे विमान १७ ऑगस्ट रोजी भारतात दाखल होणार असल्याचे महसूल उपायुक्त सतीश खडके यांनी सांगितले.

यंदा राज्य शासनाने ३१ कोटी रुपयांची तरतूद करून राज्यातील अवर्षणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कॅथी क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टन्सी (केसीएमसी) या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्या कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतरही कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी दिरंगाई झाली. अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी जोर धरू लागली. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्टच्या पहिल्या पाऊस पाडण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाची घोषणा केली.

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी सोलापूरहुन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे (आयआयटीएम) विमान औरंगाबाद विमानतळावरून हवेत झेपावले. त्या विमानाच्या ट्रायलनंतर टिपूसही पावसाची नोंद झाली नाही. मात्र, ज्या कंपनीला कंत्राट या प्रयोगाचे कंत्राट दिले आहे, त्याच कंपनीचे विमान असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले. प्रत्यक्षात ते विमान सोलापूरमध्ये उभे केलेल्या आयआयटीएमच्या केंद्राचे होते. ते आता सोलापुरात परतले आहे. आयआयटीएमचे सोलापुरात असलेले केंद्र स्वतंत्र कार्य करते.

राज्य शासनाने ज्या केसीएमसी कंपनीला कंत्राट दिले आहे, त्या कंपनीचे विमान १७ ऑगस्टमध्ये येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले. ते विमान सध्या सौदी अरेबियात आहे. त्यानंतर ते अहमदाबादला येईल. तिथे कस्टमच्या प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादमध्ये दाखल होईल. त्यानंतर कृत्रिम पावसाच्या खऱ्या प्रयोगाला सुरुवात होईल. धक्कादायक म्हणजे ८ ऑगस्ट रोजी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व परवानग्या, कस्टमचे विषय संपले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. या सगळ्या खटाटोपानंतर कृत्रिम पावसाची ट्रायल उघड झाली आहे. राज्य शासनाकडून कृत्रिम पावसाची तारीख पाळण्यासाठी ही 'ट्रायल' दाखवून दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

अमेरिकेहून विमान सौदी अरेबियात दाखल झाले आहे. त्या ठिकाणी सध्या विमानातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे, तपासणीचे काम सुरू आहे. १७ तारखेला ते विमान भारतात दाखल होईल. अहमदाबादमध्ये कस्टम विभागाच्या प्रक्रिया पूर्ण करून १८ तारखेला विमान औरंगाबाद विमानतळावर प्रयोगासाठी सज्ज असेल. - सतीश खडके, उपायुक्त (महसूल)

कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाची घोषणा करताना 'मिशन डायरेक्टर' म्हणुन नंदुरबारचे अप्पर उपजिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रयोगाच्या तिसर्या दिवशी बगाटे हे परत नंदुरबारला पोचले. अद्यापपर्यंत त्यांना 'मिशन डायरेक्टर' म्हणून कुठलेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. एकीकडे 'खऱ्या' कृत्रिम पावसाचे विमान नाही आणि संबंधित अधिकारी औरंगाबादेत नसल्याने पाऊस कसा पडेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com