अकरावीच्या जागा रिक्तच
विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती
धाराशिव, ता. ३ (बातमीदार) : जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशाची स्थिती यंदा बिकट असून, उपलब्ध क्षमतेच्या जवळपास ४८ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या एकूण २९ हजार ६६० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ १५ हजार १०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, तब्बल १४ हजार ५५७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी काही कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना मोठी धावपळ करावी लागणार आहे.
जागा रिक्त राहण्यामागे यंदा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची घटलेली संख्या हे प्रमुख कारण मानले जात आहे. जिल्ह्यातून यंदा सुमारे २० हजार विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. त्यातच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी परजिल्ह्यातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती दिली आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशाच्या दृष्टीने चांगले शिक्षण, तसेच खासगी शिकवणीची सुविधा उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांकडे या विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. दुसरीकडे, अनेक विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक डिप्लोमा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड केली आहे.
सध्या अकरावी प्रवेशाची आठवी फेरी सुरू असून, या फेरीतून किती विद्यार्थी प्रवेश घेतात, यावर अनेक कनिष्ठ महाविद्यालयांतील तुकड्यांचे आणि प्राध्यापकांच्या पदांचे भवितव्य अवलंबून आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी राहिल्यास काही तुकड्या बंद होण्याची शक्यता आहे.