छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा. योग्य मार्गदर्शन आणि चिकाटीच्या जोरावर विद्यार्थी भविष्यातील संधींना गवसणी घालतात. दहावी-बारावी तर भावी करिअरची जणू लिटमस टेस्टच. आता ही टेस्ट यशस्वी करण्याची वेळ आली आहे. शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान; तर दहावीची बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. त्यानुसार पुढच्या दोन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा असणार आहे.
बारावीच्या परीक्षेला एक; तर दहावीच्या परीक्षेला केवळ दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी केवळ रात्रंदिवस अभ्यास करणे आवश्यक नाही, तर त्यासाठी मुलांचे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहणेदेखील आवश्यक आहे. परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्मरणशक्तीचे गणित विद्यार्थ्यांना आताच जुळवावे लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा असणार आहे. त्यासाठी या काळात पालकांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.बारावीचे हॉल तिकीट
बारावीचे हॉल तिकीट सोमवारपासून
बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन हॉलतिकीट सोमवारपासून (ता. २२) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत. त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रातील दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत, असा शेरा द्यावा, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.
हे अवश्य करा
अभ्यासाचे वेळापत्रक करा
नियमित जुन्या प्रश्नपत्रिका
सोडवा, सराव करत राहा
रोज पोषक आहार घ्या
अभ्यासासोबतच थोडे मनोरंजनही गरजेचे
अभ्यास करताना कंटाळा आल्यास मध्येच पाणी प्या, त्यामुळे ताजेतवाने वाटेल.
नियमित व्यायाम करा
हे नक्की टाळा
मोबाइलपासून दूर राहा
रात्रीची झोपमोड करून अभ्यास मुळीच नको
शिळे अन्न ग्रहण करू नका
तासन्तास एकाच ठिकाणी अभ्यासाला बसू नका
या काळात आरोग्यही महत्त्वाचे. त्यामुळे फास्टफूडचे सेवन करणे टाळा
नकारात्मक विचार दूर सारा
पालकांनो, मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या
बारावीची परीक्षा जवळ आली आहे. मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असल्याशिवाय परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाहीत. त्यासाठी पालकांनी मुलांच्या डाएट प्लॅनकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुले परीक्षा जवळ आली की, तयारीसाठी तासनतास अभ्यास करतात. अभ्यास करण्याच्या नादात जेवण, पाणी पिण्याचे देखील भान राहत नाही. याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे. एकाच वेळी जास्त जेवू नये. अन्यथा पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. जास्त जेवल्यास मुलांना झोपही लागण्याची शक्यता असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.