कार्यक्षमता वाढीसाठी एआयची मदत घ्या
---
मसिआ महिला विंगतर्फे ‘एआय फॉर एमएसएमई’ सेमिनार
---
वाळूज, ता. १४ : मसिआच्या महिला विंगतर्फे ‘एआय फॉर एमएसएमई’ या विषयावर शनिवारी (ता. १२) वाळूज येथील मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या (मसिआ) कार्यालयात मार्गदर्शनपर सेमिनार झाला. एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासह व्यवसायवृद्धीसाठी त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल, याबाबत आयआयटी प्रमाणित जनरेटिव्ह एआय मास्टर ट्रेनर आणि सल्लागार योगेश परदेशी यांनी मार्गदर्शन केले.
मसिआचे अध्यक्ष गजानन देशमुख, महिला विंगच्या संयोजिका पल्लवी दलाल आणि सहसंयोजिका सोनल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. देशमुख म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील गोष्ट नसून आजच्या उद्योगाची गरज बनली आहे. मोठ्या उद्योगांप्रमाणेच एमएसएमई आणि महिला उद्योजकांनीही एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून व्यवसायाची कार्यक्षमता, बाजारपेठ आणि स्पर्धात्मकता वाढवणे आवश्यक आहे.’
दलाल म्हणाल्या, ‘आजच्या डिजिटल युगात महिला उद्योजकांनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत पुढे जाणे आवश्यक आहे. एआय हे केवळ तंत्रज्ञान नसून व्यवसाय अधिक स्मार्ट, वेगवान आणि कार्यक्षम करण्याचे प्रभावी माध्यम आहे. महिला उद्योजकांना एआयच्या माध्यमातून व्यवसायात नवीन संधी निर्माण करता याव्यात, या उद्देशाने सेमिनारचे आयोजन करण्यात आले.’
‘मर्यादित मनुष्यबळ आणि संसाधनांमध्ये व्यवसाय अधिक कार्यक्षम पद्धतीने चालवण्यासाठी एआय तंत्रज्ञान महिला उद्योजकांसाठी विशेष उपयुक्त ठरू शकते’, असे सोनल भोसले यांनी सांगितले. परदेशी यांनी एमएसएमईसाठी एआयचे महत्त्व, व्यवसायातील विविध कामांमध्ये एआयचा वापर, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक सेवा, डेटा विश्लेषण, वेळ व खर्चाची बचत तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी उपलब्ध एआय साधनांची माहिती दिली. योग्य प्रॉम्प्ट कसा तयार करावा, एआय साधनांचा प्रभावी वापर कसा करावा आणि एआयच्या मदतीने व्यवसायाची उत्पादकता व स्पर्धात्मकता कशी वाढवावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमासाठी मसिआ महिला विंगच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. यावेळी ‘उद्योग संवाद’चे संपादक सर्जेराव साळुंके, कार्यकारिणी सदस्य विनोद गांधी, रत्नप्रभा शिंदे, राजश्री कुलकर्णी, राधा तोरणेकर, सुलभा थोरात, संध्या साळुंके, तेजश्री शिंदे, मनीषा मंगलगे आणि विविध उद्योजक उपस्थित होते. संध्या साळुंके यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
---
केले प्रश्नांचे निरसन
सहभागी महिला उद्योजिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत व्यवसायातील प्रत्यक्ष अडचणी आणि एआयविषयी विविध प्रश्न उपस्थित केले. परदेशी यांनी त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. त्यामुळे हे सत्र संवादात्मक, उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.