((अँकर))
-------
तंत्रज्ञानाची जोड देत उसाचे उत्पादन दुप्पट करणार
------
शेतकऱ्यांचा निर्धार, ‘एआय’वर आधारित ऊस शेतीसाठी पाडोळीत शिवारफेरी व चर्चासत्र
-----
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ९ ः कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उसाचे उत्पादन दुप्पट करायचे आणि पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करायचा, असा ठाम निर्धार पाडोळी (आ.) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी (ता. नऊ) मौजे पाडोळी (आ.) येथे एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक प्लॉट पाहणी, शिवारफेरी आणि शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा एकमुखी संकल्प केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. नीलेश बारखडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
------
शेतात पोचले कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान
चर्चासत्रापूर्वी मान्यवर आणि शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या ऊस पिकाच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. एआयच्या साह्याने उसावरील किडी व रोगांचे वेळेत निदान करणे, जमिनीच्या गरजेनुसार खतांचा अचूक वापर आणि पाण्याची बचत करून भरघोस उत्पादन कसे घ्यायचे, याचे थेट शेतात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे उत्पादन खर्च घटून उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे तज्ज्ञांनी पटवून दिले.
या शिवारफेरी व चर्चासत्रासाठी कारखान्याचे संचालक मुकुंद पाटील, संचालक राहुल सूर्यवंशी, संचालक भारत गुंड तसेच माजी संचालक वसंत कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय सतीश देठे, उत्तमराव पवार, विकास ढवळे, बालाजी स्वामी, दत्ता जावळे, शेषराव जावळे, मधुकर पाटील, वामन गाते, सोनार साहेब, शाहूराज गुंड आदी उपस्थित होते.
......
OSM26B06950 धाराशिव ः पाडोळी (आ.) येथे बुधवारी आयोजित एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक प्लॉट पाहणी, शिवार फेरी आणि शेतकरी चर्चासत्रात मार्गदर्शन करताना तज्ज्ञ.