‘कमी पाण्यात अन् खर्चात ऊस
जगवण्यासाठी एआयचा आधार’
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ६ ः कठीण परिस्थितीत पाणी बचत करून ऊस पिकवणे गरजेचे आहे. यासाठी कारखान्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, पहिल्या टप्प्यात २५० शेतकऱ्यांना सहभागी करून कमी पाण्यात व कमी खर्चात ऊस कसा जगवायचा, याचे मार्गदर्शन केले जात आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांनी केले.
केशेगाव (ता. धाराशिव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक बैठक अरविंदनगर येथे नुकतीच पार पडली. ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने गोरे यांना या वर्षीचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल आंबेडकर परिवाराच्या वतीने हरिदास कळसुले व आगतराव लोमटे यांच्या हस्ते गोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सातही सर्कलनिहाय अहवाल वर्षात सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. कार्यकारी संचालक एस.पी. डाके यांनी बैठकीसमोर मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना व ठरावांना उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली. कारखान्याचे उपाध्यक्ष विलास भुसारे यांनी आभार मानले.
.......
धाराशिव ः केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे.
....
फोटो क्रमांक ः OSM26B06861