स्थानिक बंदविरोधात अंबडचे व्यापारी एकवटले
अंबड, ता. १७ (बातमीदार) : अंबड शहरातील बाजारपेठ वारंवार होणाऱ्या स्थानिक पातळीवरील बंदमुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने, यापुढे कोणत्याही स्थानिक कारणासाठी बाजारपेठ बंद ठेवण्यात येऊ नये, असा निर्णय शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (ता. १६) पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की अंबड शहरातील बाजारपेठ वारंवारच्या बंदमुळे व्यापारी वर्ग पुरता हैराण झाला आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहे. त्यातच विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांकडून वेळोवेळी बंद पुकारण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बाजारपेठ बंद न केल्यास व्यापाऱ्यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, लाठ्या-काठ्या घेऊन दुकाने फोडण्याची भाषा करणे, तसेच ५० ते १०० जणांचा जमाव दुकानात घुसून धाक-दडपशा दाखविणे, अशा घटना घडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, त्याचा व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी व देशव्यापी बंद वगळता कोणत्याही स्थानिक पातळीवरील बंदमध्ये सहभागी न होण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तसेच जालना जिल्हा व्यापारी महासंघाकडून सूचना मिळेपर्यंत अंबड शहराची बाजारपेठ बंद ठेवली जाणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील व्यापारी कोणत्याही जात, धर्म, पंथ, सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून, सातत्याने होणाऱ्या स्थानिक बंदमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.