-----------
फोटोसह ABD26J79074
सेनगाव ः औंढा नागनाथ ते पानकनेरगाव कावड यात्रेत सहभागी युवक.
---------------
औंढा नागनाथ ते पानकनेरगाव कावडयात्रा
------------
पानकनेरगाव दुमदुमले; सातशे युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
सेनगाव, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील पानकनेरगावचे ग्रामदैवत माणकेश्वर बाबा यांच्या श्रद्धेतून सुरू असलेली सार्वजनिक कावडयात्रा यंदाही उत्साहात पार पडली. चौथ्या श्रावण सोमवारी औंढा नागनाथ येथून पानकनेरगावपर्यंत कावड आणण्यात आली. या यात्रेत गावातील सातशे युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दरवर्षीची परंपरा जपत माणकेश्वर सार्वजनिक कावड मंडळाने हा उपक्रम आयोजित केला होता. औंढा नागनाथ येथून पवित्र जल कावडीत घेऊन तरुणांनी पायी प्रवास करत ते पानकनेरगाव येथे आणले. गावात कावडीचे आगमन होताच भाविकांनी भक्तिभावाने स्वागत केले. त्यानंतर पवित्र जल माणकेश्वर बाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले. कावड यात्रेदरम्यान गावातील महिला, भजनी मंडळे, लहान मुलेही मोठ्या उत्साहाने सहभागी झाली. भक्तिगीते, भजने आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. गावकऱ्यांनी कावड मंडळातील युवकांना विविध प्रकारे सहकार्य केले. माणकेश्वर बाबांच्या चरणी पवित्र जल अर्पण करून गावातील सर्व नागरिकांचे सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. शेतीसाठी चांगला पाऊस पडावा, गावात शांतता व एकोपा नांदावी अशी प्रार्थना करण्यात आली. कावड यात्रेनिमित्त तरुणाईचा उत्साह, महिलांचा सहभाग आणि ग्रामस्थांचे सहकार्य यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक एकोपा जपणारा हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचे आकर्षण ठरला.
((चौकट)))
चौथ्या वर्षीही परंपरा कायम
माणकेश्वर सार्वजनिक कावड मंडळातर्फे आयोजित कावड यात्रेचे यंदा चौथे वर्ष होते. युवकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली ही धार्मिक परंपरा ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे अधिक व्यापक होत असल्याचे यावेळी दिसून आले.
-----------------
पोलिसांचा सेनगाव तालुक्यात
डीजेला ‘नो एंट्री’चा इशारा
सेनगाव, ता. १० (बातमीदार) : गणेशोत्सव म्हटला की उत्साह, जल्लोष आणि भक्तिभाव, मात्र या उत्साहाला नियमांची चौकट असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सेनगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.नऊ) आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ‘सण-उत्सव भक्तिभावाने साजरे करा, मस्तीत नाही’, असा संदेश देत डीजे, पत्ते व दारूमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी संतीशकुमार वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक नागेश शेट्टीवार, पोलिस पाटील व नागरिक उपस्थित होते. सण-उत्सवांची परंपरा जपत सामाजिक सलोखा कायम ठेवावा. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे तालुक्यातही उत्सव भक्तिभावाने साजरा करावा, असे वाघ यांनी सांगितले. उत्सवाच्या दहा दिवसांत पोलिस पाटलांनी गावात उपस्थित राहून अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. शांततापूर्ण, सामाजिक संदेश देणारा, आदर्श गणेशोत्सव साजरा करणाऱ्या उत्कृष्ट मंडळांना सेनगाव पोलिस ठाण्यातर्फे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा जल्लोषापेक्षा भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
------
तालुक्यातील ८४ गावांत १७० मंडळे
सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८४ गावांत तब्बल १७० सार्वजनिक मंडळे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी केले. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
------
((चौकट)))
डीजे वाजवल्यास कारवाई
डीजेच्या वापराबाबत संबंधित गणेश मंडळांना नोटिसा देण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जाधव यांनी दिला. सण-उत्सवात कायदा व सुव्यवस्था, ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि सामाजिक सलोखा यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-----------
सेनगाव तालुक्यात सरपंच आरक्षण जाहीर
१०७ ग्रामपंचायतींसाठी सोडत; अनेक ठिकाणी बदलली गणिते
सेनगाव : तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सुधारित आरक्षण सोडत बुधवारी (ता. नऊ) तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षण संख्येत वाढ झाल्याने काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे यापूर्वीचे आरक्षण बदलले आहे.
या सोडतीत वरुड चक्रपाण ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी जाहीर झाले. तर बटवाडी, लिंबाळा हुंडी ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण महिला (खुला महिला) प्रवर्गासाठी राखीव झाले. आरक्षण बदलामुळे या ग्रामपंचायतीत इच्छुकांच्या राजकीय गणिताला नवे वळण मिळाले आहे.
तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती २०, अनुसूचित जमाती ७, ना.मा.प्र. २६, सर्वसाधारण ५४ सरपंचपदे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांसाठी अनुक्रमे १०, ४, १३ आणि २७ जागा राखीव आहेत.
आरक्षण सोडतीस तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, निवडणूक नायब तहसीलदार वाकळे, तसेच विनोद चिलगर, नवनाथ दलसिंगार, सचिन पोपते यांच्यासह तहसील व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. सोडतीची प्रक्रिया पाहण्यासाठी तालुक्यातील ग्रामस्थ व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------
फोटोसह ABD26J79073
सेनगाव ः तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देताना काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते.
---------------
कॉॅंग्रेसचा सेनगाव तहसीलवर मोर्चा
----------
तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
सेनगाव, ता. १० (बातमीदार) : पावसाच्या खंडामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याने तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता.नऊ) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, पीकविम्याचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली. शेतीसाठी अडचणीचे ठरणारे स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबवावे, सुकळी तलाव प्रकल्प रद्द करावा, पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या. या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास काँग्रेसतर्फे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चात काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, ज्येष्ठ नेते सुरेशअप्पा सराफ, शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे, विनायकराव देशमुख, डॉ. नीळकंठ गडदे, बंटीभैया नागरे, रामेश्वर हेन्द्रे, एकनाथ शिंदे, संतोष पोले, जुबेर देशमुख, भारत कोटकर, अझर देशमुख, राजू स्वामी, सचिनअप्पा शेरकर, गुलाबअप्पा हेन्द्रे, शिवराज पाटील मरडे, शंकर देशमुख, लखन खेडेकर, दिनकरराव गडदे, भीमराव गडदे, सुधाकर बिरगड, माधवराव बिरगड, शुभम गडदे, शंकर गडदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
---------------------------------
गिरगाव-मालेगाव रस्त्यावर
गतिरोधक बसवण्याची मागणी
गिरगाव, ता.१० (बातमीदार)ः गिरगाव येथील हु. बहिर्जी स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोरील मालेगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून मालेगावकडे जाणारा प्रमुख रस्ता असल्याने या मार्गावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हुतात्मा बहिर्जी स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परिसरातील १२०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार मालेगाव रोडलगत असल्याने सकाळी शाळेची वेळ, दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची रस्त्यावर मोठी गर्दी होते. त्याचवेळी या मार्गावरून वाहने वेगाने जात असल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना, शाळेत प्रवेश करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे वाहनांचा वेग कमी व्हावा, शाळेच्या परिसरात संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी शाळेच्या मुख्य गेटसमोर मालेगाव रोडवर गतिरोधक बसविणे आवश्यक असल्याची मागणी शाळा प्रशासनाने निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. शाळेने यापूर्वी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावरही संबंधित विभागाकडे निवेदने देऊन गतिरोधक बसविण्याची मागणी केली मात्र अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष असल्याने पालकांत चिंतेचे वातावरण आहे.
((चौकट)))
अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शाळेच्या मुख्य गेटसमोर गतिरोधक बसविल्यास वाहनांचा वेग कमी होऊन विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल, असे नमूद केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळेसमोरील मालेगाव रोडवर तातडीने गतिरोधक बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित विभागाने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी अपेक्षा पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
------------------
सोयाबीन, मूग, उडीद पिके धोक्यात
गिरगाव, ता. १० (बातमीदार)ः गिरगाव परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून सोयाबीन, मूग, उडीद पिके धोक्यात आल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे.
गिरगावसह परजना, खाजमापूर, वाडी, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द, मुंरुबा माळवटा आदी भागांत हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक डोळ्यांसमोर वाळू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीनची पूर्ण वाढ झाली असून पिकाला शेंगा भरण्यास सुरवात झाली आहे. पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, नेमक्या याच काळात पावसाने ओढ दिल्याने उभी पिके मान टाकू लागली आहेत. महागडी बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च करून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक फुलवले होते मात्र पाऊस गायब झाल्याने उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
((कोट))
पावसाच्या दीर्घ खंडामुळे तालुक्यातील बळिराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करावी, पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा.
-विश्वनाथ कऱ्हाळे,
शेतकरी, गिरगाव
----------------------------
अवती भवती
फोटोABD26J79072
हिंगोली ः पंढरी मापारी यांचा वरूड गवळी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
--------------
पंढरी मापारी यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार
हिंगोली ः वरूड गवळी येथील पंढरी मापारी रशियातून एमबीबीएस पदवी पूर्ण करून आल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती प्रकाशराव दीपके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक रवी डोरले, ग्रामपंचायत सदस्य शेख इस्माइल, सुनील जाधव बंडू ऊर्फ जयाजी मापारी, पवन कोळपे, दशरथ सावळे, सोनाजी मापारी, वेजनाथ मापारी, भगवान मापारी, बेंगाळ मामा, नागनाथ मापारी आणि गावकरी उपस्थित होते.