
Aurangabad Crime : सहा जणांना जन्मठेप
औरंगाबाद : शेतात ट्रॅक्टर नेल्यावरून बेदम मारहाण केल्यानंतर जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सहा आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.
शेतातून टॅक्ट्रर नेल्याच्या क्षुल्लक कारणावरुन भावकीतील बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २६ जून २०२१ रोजी रात्री घारदोन (ता. जि. औरंगाबाद) येथे घडली होती. मारहाणीत जखमी माणिकराव नवपुते (वय ६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
रवी ऊर्फ रवींद्र श्रीराम नवपुते (वय २२), अमोल बद्रीनाथ नवपुते (२१), हरी ऊर्फ हरिभाऊ बाबुराव नवपुते (२१), भास्कर भुंजगराव नवपुते (४८), राम ऊर्फ रामभाऊ बाबुराव नवपुते (२५) आणि श्रीराम जनार्धन नवपुते (४८, सर्व रा. घारदोन ता. जि. औरंगाबाद) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रकरणात मृत माणिकराव नवपुते यांचा मुलगा गोरख नवपुते याने फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीची घारदोन येथील शेतात जाण्यासाठी फिर्यादीचे चुलतभाऊ श्रीराम नवपुते व भास्कर नवपुते यांच्या शेतातून रस्ता आहे. २६ जूनरोजी सकाळी फिर्यादी व त्यांचा भाऊ विक्रम असे दोघे शेतात रोटा मारत असताना टॅक्ट्ररचालक दीपक नवपुते याला रवी नवपुते याने फोन करून तू माझ्या शेतातून टॅक्ट्रर का घेऊन गेला म्हणून शिवीगाळ केली होती.
रात्री आठच्या सुमारास वरील आरोपी हे साथीदारांसह विक्रमच्या घरी आले. त्यांनी विक्रमला शिवीगाळ करून डोके फोडले. आवाज ऐकून माणिकराव नवपुते हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना देखील जबर मारहाण केली. उपचारादरम्यान जखमी माणिकराव यांचा मृत्यू झाला. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
न्यायालयात सहायक पोलिस निरीक्षक व्ही. आर. पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड, कलम ३०७ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजर रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर उर्वरित सहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.