
औरंगाबाद : पहिल्याच पावसात रस्त्यावर तळे
औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्याची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेतर्फे केला जात असला तरी पहिल्याच पावसापासून नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. हर्सूल ते पिसादेवी रोडवर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे.
मृग नक्षत्राच्या पावसाने गुरुवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. शहर परिसरात वादळी वाऱ्यासह दीड ते दोन तास पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसे हायसे वाटले. पण या पहिल्या पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडले. त्यानंतर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाळा सुरू होताच हर्सूल-पिसादेवी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. या रस्त्यावर पहिल्याच पावसाने मोठा चिखल झाला आहे.
हर्सूल ते पिसादेवी रस्त्याचे सिमेंट कॉंक्रेटीकरण करण्याच्या अनेकदा घोषणा झाल्या. पण काम झालेले नाही. भगतसिंगनगरपासून पिसादेवीपर्यंतचा रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे वाहने चिखलात फसत आहेत. मयुरपार्क, हर्सूल यासह नव्याने निर्माण झालेल्या वसाहतीत पाणी वाहून जाण्यासासाठी जागा नसल्यामुळे या भागात दरवर्षी रस्त्यावर पाण्याचे डबके साचत असल्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
हर्सूल-पिसादेवी रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. येत्या काही दिवसात रस्त्याचे काम सुरू होईल, असे बॅनर रस्त्यावर लावण्यात आले. पण पहिल्याच पावसामुळे या भागात रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे. पण बॅनर्स लावणारे गायब झाले आहेत.
-रवींद्र औताडे, आईसाहेब युवा संघटना शहर-जिल्हाध्यक्ष.
या रस्त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला, पण प्रशासनाला नागरिकांची किव आली नाही. प्रशासन, राजकारण्यांचे काम ‘तुम्ही मारल्या सारखे करा, आम्ही रडल्या सारखे करतो’ असे आहे. हर्सूल-पिसादेवी रस्त्यालगतच्या वसाहतींना कुणीही वाली उरला नाही.
-गोरख औताडे, व्यावसायिक.
Web Title: Aurangabad Hersul To Pisadevi Road Block First Rain Water
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..