
औरंगाबाद : राज्य शासनाने बुधवारी घेतलेल्या निर्णयामुळे आता महापालिकेत पुन्हा ११५ वॉर्ड होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडी सरकारने वाढीव लोकसंख्येचा विचार करुन वॉर्डांची संख्या १२६ केली होती. २०१७ नुसार महापालिकेच्या निवडणूका घेण्याचा निर्णय झाला. त्यात लोकसंख्येचा निकष देखील ठरवण्यात आला. या निकषानुसार बारा लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेत ११५ वॉर्ड असतील, त्या पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक चाळीस हजार लोकसंख्येसाठी एक अतिरिक्त पालिका सदस्य असेल असे नमूद करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या बारा लाख २८ हजार ३२ एवढी गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे बारा लाख चाळीस हजार हा आकडा पार होऊ शकत नाही. त्याचा परिणाम म्हणून ११५ वॉर्डच राहण्याची शक्यता आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचना!
शासनाने घेतलेल्या निर्णयात प्रभाग रचना राहणार किंवा वॉर्ड रचना राहणार? याविषयी स्पष्टता नाही. असे असले तरी भाजपच्या धोरणानुसार तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द होऊन आता चार सदस्यीय प्रभाग रचना होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शहरात २९ प्रभाग होतील. त्यातील २८ प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीस सदस्यांचा असेल. पुढील प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
...अन् प्रशासन सापडले पेचात
औरंगाबाद : महापालिका निवडणूकीसाठी एकीकडे प्रशासनाने आरक्षण सोडतीसाठी बुधवारी रंगीत तालीम घेतली तर दुसरीकडे सायंकाळी शासनाने नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पेचात सापडले आहे. शुक्रवारी ऑगस्टला आरक्षणाची सोडत निघणार होती पण त्याबद्दल आता अनिश्चितता आहे. रखडलेल्या महापालिका निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार बुधवारी महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत संत एकनाथ रंग मंदिरात प्रशासनाने रंगीत तालीम घेतली. यावेळी उपायुक्त तथा निवडणूक विभागाचे प्रमुख डॉ. संतोष टेंगळे, नगर रचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसंख्येनुसार कमाल आणि किमान वॉर्ड किती असावेत याचे निकष देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवले आहे. त्यामुळे प्रभाग रचना रद्द करून पुन्हा वॉर्ड रचना नव्या निकषानुसार करावी लागणार का? शुक्रवारची आरक्षण सोडत रद्द होणार का? असे प्रश्न प्रशासनाला पडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.