Aurangabad News : वेदनेला अंत नाही अन् कुणालाही खंत नाही..!

फुलंब्री : कडाक्याच्या थंडीत पिकांसाठी शेतकऱ्यांची धडपड
Aurangabad News
Aurangabad Newssakal

फुलंब्री : ‘जगाचा पोशिंदा शेतकरी’ हे विधान सत्य असले तरी, राजकारण्यांसाठी हे ब्रीद केवळ कांगावा करून मत जिंकण्याचे माध्यम ठरले आहे. शेतात असलेल्या कोवळ्या पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आता ''अंधार यातना भोगाव्या लागत आहेत. दिवसभर शेतात राबायचे आणि रात्रभर ओलितासाठी जागायचे, असे धोरण महावितरणने हाती घेतल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांना वेदना सहन कराव्या लागत आहे. परंतु, या गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधी मात्र गप्प असून कुणालाही खंत नसल्याचे तालुक्यात चित्र आहे.

सध्या थंडीचा जोर वाढत चालला असून शेतशिवारामध्ये रब्बी पिकांना ओलिताचे काम सुरू आहे. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र दिवसा वीज कमी मिळत असल्याने रात्री जागरण करीत पिकांना पाणी द्यावे लागते आहे. निसर्गापाठोपाठ विद्युत वितरणही शेतकऱ्यांच्या जिवावर उठले असून शेतकऱ्यांनीच रात्रभर का जागावे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे सततच्या ओला व कोरडा दुष्काळ आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शेती आणि शेतकरी यांच्या बाबत घेतलेले धोरण, काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.

तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवस व रात्री असा वीजपुरवठा केला जातो. त्यातच दिवसा होणाऱ्या वीजपुरवठा तांत्रिक दुरुस्ती नावाखाली तासनतास खंडित असतो. रात्री ओलितासाठी शेतात जातांना शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन ओलित करावे लागते. शेतशिवारात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. हे वन्यजीव कधी शेतकऱ्यांवर हल्ला करतील याचा नेम नाही. त्यातच सर्प, विंचू यांच्या सोबतीने दहशतीत शेतकरी रात्रभर शेतात उभे राहून मोठ्या कष्टाने शेतात पेरलेले पीक जगवण्यासाठी हा संघर्ष अतितीव्र बनला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनाचे काम करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

रात्रीला महावितरणचा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर रोहित्रावर अनेक तांत्रिक बिघाड होत असतात. ते विजेची उपकरणे दुरुस्तीसाठी रात्रीच्या वेळी धावपळ करावी लागते. रात्री होणाऱ्या थ्री फेज वीज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरत आहे. परिणामी शेतकरी वर्ग वीजवितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करीत असून काबाडकष्ट करून शेतकऱ्यांना या गंभीर प्रकारामुळे जागरण करावे लागते. याउलट औद्योगिक वसाहतीला २४ तास वीज पुरवठा केला जातो. तर शेतीसाठी रात्रीचा विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

शेतकरी दिवसभर राबत असताना पिकाच्या सिंचनासाठी आता रात्रभर जागण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आली आहे. महावितरण कंपनी वारंवार शेतकरी विरोधी धोरण अवलंबित असून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहे. जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनीही याकडे तत्काळ लक्ष देऊन कृषिपंपांना सातही दिवस दिवसा वीज पुरवठा करावा. शेतातील पिके जगतील, तरच शेतकरी जगेल. अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com