Aurangabad : यंदा शेतकऱ्यांची दिवाळी साधेपणाने साजरी

पैठण : परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने दमडीही हाती आली नाही
Paithan farmer heavy crop damage
Paithan farmer heavy crop damage

पैठण : यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी अन् परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानामुळे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची जवळपास सर्वच पिके हातातून गेली आहे. यामुळे दमडीचेही उत्पन्न हाती न आल्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे.

पैठण तालुक्यात यंदाचा हंगामच हातून गेल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शेतकरी दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर हलक्या पिकाची कापणी आणि मळणी करून त्याची विक्री करून दिवाळी साजरी करीत असतो. याच भरवशावरच शेतकऱ्याची दिवाळी, माहेरवाशिणीला कपडे-लत्ते, घरातील लग्न कार्य, कर्जफेड असे नियोजन केले होते.

परंतु यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हे सर्व नियोजन कोलमडले आहे. त्यात सरकारकडूनही मदतीच्या नावावर तोंडाला पाने पुसण्यात आल्याने बळिराजाला दिवाळी अंधारातच साजरी करण्याची वेळ आली.

यावर्षी सुरुवातीलाच निसर्गाची चांगली साथ मिळाली होती. मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतली होती. पण बोगस बियाणांचा फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

असे असताना पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापूस, सोयाबीन, तूर,बाजरी आदी पिकांवर भर दिला. पिकाला पाहिजे तेव्हा पाऊस होत राहिल्याने पिके चांगलीच भरात आली होती. मूग, उडीद पीक हाती आले असतानाच पावसाचा फटका बसला.

ही पिके हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची आशा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर होती. ही पिके शेंगा बनविण्याच्या प्रक्रियेत असतानाच पावसाने दगा दिला. नंतर ही पिके हाती येत असतानाच अतिवृष्टी झाली. शेतकरी या सोयाबीन पिकाची कापणीच्या कामाला सुरुवात करतो ना करतो तोच निसर्गाने खेळ मांडला व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही

सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस सुरु होतो. ऑक्टोबरमध्ये कडक ऊन पडते. या महिन्यांत तापमानाचा पारा इतका प्रचंड वाढतो की, अंग करपून निघते. मात्र, यंदा ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. गेल्या काही दिवसात पाऊसच आहे. कधी थंडी तर कधी गार वारा आहे.

प्रोत्साहन अनुदान मिळेना!

शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती; पण दिवाळी सण येऊन अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही. जवळपास आठ हजारांवर शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com