Aurangabad : रिक्षाचा बंद ‘बस’ला फायदा

बसला तुडुंब गर्दी, चौकाचौकात प्रवासी सैरभर
bus
bussakal

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाकडून रिक्षाच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात शहरातील विविध रिक्षा संघटनांतर्फे बेमुदत बंदला सुरवात केली आहे. पहिल्याच दिवशी रिक्षाच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे मात्र, प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले. तर रिक्षाच्या संपामुळे

कधी नव्हे त्या स्मार्ट बस खचाखच भरलेल्या दिसून आल्या. यामुळे पालिकेचे उत्पन्न चार लाखांनी वाढले. दुसरीकडे बेकायदेशीर चालणाऱ्या रिक्षांच्या विरोधातील कारवाई थांबणार नाही, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

शहरात आरटीओ कार्यालयाने बेशिस्त रिक्षाचालकांना लगाम लावण्याच्या विरोधात थेट जप्ती मोहीम सुरु केली. रिक्षाचालकांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने भाडेवाढ दिलेली आहे. त्यामुळे जुन्या मीटरमध्ये बदल करणे (कॅलिब्रेशन) अनिवार्य आहे. यासाठी सुरुवातीला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, असे असताना दुसरीकडे कारवाईही सुरु करण्यात आल्याने रिक्षाचालकांनी बंदचे हत्यार उपसले आहे.

या कारवाईच्या विरोधात काही रिक्षा संघटनांतर्फे बंदची हाक देण्यात आली होती. शहरात गुरुवारी (ता.१) रस्त्यावरील रिक्षा गायब झाल्या होत्या. सकाळच्या सत्रात काही रिक्षा रस्त्यावरून धावत होत्या, मात्र त्यानंतर बंदमध्ये सहभागी झालेल्या रिक्षा चालकांनी धावणाऱ्या रिक्षाचालकांवर दबाव आणला, काही ठिकाणी शिवीगाळ आणि रिक्षाची तोडफोड करण्याच्या धमक्या दिल्याने रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षाही काही वेळेत गायब झाल्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

रिक्षा संघटनेचे निवेदन

आयटक प्रणीत लाल बावटा रिक्षा चालक-मालक युनियन तर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी रिक्षाच्या विरोधात मिटर कॅलिब्रेशन नसल्याच्या कारणाने कारवाई केली जात नाही, मात्र ज्यांच्या रिक्षाला मीटरच नाहीत, त्यांच्यावर कारवाई केल्याचे मैत्रेवार यांनी स्पष्ट केले.

रिक्षाचालकांनी मिटर कॅलिब्रेशनसाठी दिल्यानंतर रिक्षाला मिटर नाही असे म्हणून कारवाई केली जात असल्याची बाब ॲड अभय टाकसाळ यांनी निदर्शनास आणून दिली.

शहरात तब्बल ३५ हजार रिक्षा असताना मिटर कॅलिब्रेशनसाठी केवळ सहा केंद्र असल्याने मिटर दुरुस्ती कधी होणार असा प्रश्न ॲड टाकसाळ यांनी उपस्थित केला. मीटरच्या नावाने सुरु असलेली अन्यायकारक दंड आकारणी करु नये यासाठी लालबावटा युनियनतर्फे शुक्रवारी (ता.२) निदर्शने केले जाणार आहेत.

दुपारनंतर संप माघार

रिक्षा चालक-मालक कृती समितीने दुपारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर येत्या दोन दिवसात प्रादेशिक परिवहन समितीची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे दुपारनंतर बंद मागे घेतल्याची माहिती, रिक्षा चालक-मालक कृती समितीचे अध्यक्ष सलीम खामगावर यांनी दिली. येत्या दहा दिवसात प्रश्न मार्गी लावला नाही तर सर्व मुलाबाळांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि सर्व आएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे गेट बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. खामगावकर यांनी सांगितले.

रिक्षाच्या विरोधात सुरु असलेली कारवाई अन्यायकारक नाही. शहरात रिक्षाचालकांची दोन वर्षापासून तपासणी झाली नाही. त्यामुळे अनेक चालकांनी मिटर काढून ठेवले आहेत. बेशिस्तपणा वाढला आहे, अनेकांची कागदपत्र पूर्ण नाहीत, त्यामुळे ही मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम पुढेही सुरुच राहणार आहे.

संजय मैत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com