औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांकडे वाढला पालकांचा ओढा

यंदा तब्बल २७ हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत
Aurangabad Zilla Parishad schools
Aurangabad Zilla Parishad schools sakal

औरंगाबाद : ‘आदर्श स्कूल’ उपक्रमामुळे राज्यभरात नाव झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यंदा शिक्षण विभागाने नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रवेशोत्सव उपक्रम’ राबविला होता. या उपक्रमामुळे यंदा तब्बल २७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेतला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या पाचपटीने जास्त आहे.

जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, काही वर्षांपूर्वी नाके मुरडली जात होती, तर खिशाला परवडत नसतानाही खासगी शिक्षण संस्थांमध्ये आपल्या पाल्याला घालण्याकडे पालकांचा आटापिटा सुरू असायचा. परंतु, दोन-तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत ''आदर्श स्कूल'' संकल्पना राबवून जिल्हा परिषद शाळांचे रूपडे बदलून टाकले आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश न घेण्यामागचे मोठे कारण होते, ते म्हणजे शाळेतील भौतिक सुविधा. वर्गखोल्यांची खराब स्थिती, प्रसाधनगृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी नसणे, मैदानात खेळण्यासाठी साधनांची मारामार अशी विविध कारणे असायची.

एकीकडे शिक्षकांना चांगला पगार असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांची कमतरता भासत असे. हे चित्र गेल्या तीन-चार वर्षांत बदललेले दिसत आहे. शिक्षण विभागाने जिल्हा परीषद शाळांमध्ये ‘मॉडेल स्कूल’, ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ तसेच निजामकालीन शाळांची दुरुस्ती आदी उपक्रमाच्या माध्यमातून आमूलाग्र बदल करताना सर्व भौतिक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. यात वर्गखोल्यांची रंगरंगोटी, मैदानात खेळाची साधने, शाळेभोवती संरक्षक भिंत, पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवले आहे. त्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

गेल्या दोन वर्षांत सहा वर्षांवरील दाखलपात्र मुलांच्या संख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक मुले जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहेत. २०२१-२२ मध्ये ६ हजार पाचशे विद्यार्थी प्रवेशित झाले होते. तर २०२२-२३ या या शैक्षणिक वर्षात तब्बल २७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला आहे. मागील वर्षीच्या तुलने ही संख्या पाचपटीने वाढ झाली आहे.

नवनवीन उपक्रम

यंदा पैठण गंगापूर, वैजापूर या तीन तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश घेतले आहे. विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे वाढता ओढा हे सुचिन्ह मानावे लागेल. यातच मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी केवळ शाळांचा दर्जाच नाही, तर गुणवत्तावाढीकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे.

शाळांना अंगणवाडीची जोडणी

अंगणवाडीतील मुलांना बडबड गीते आणि खाऊ यातून बाहेर काढून त्यांना शिक्षण देण्यासाठी नियोजन केले आहे. त्यासाठी अंगणवाड्यांना जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक जोडून दिला आहे. खासगी इंग्रजी शाळांत लहान व मोठ्या गटात जसे शिक्षण दिले जाते तसे शिक्षण या शाळांमध्ये दिले जाणार आहे, जेणेकरून पहिलीत गेल्यावर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभ पद्धतीने घेता येऊ शकेल, अशी संकल्पना यामागे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com