बँक-ग्राहक नाते विश्वासावर आधारित असावे : टोपे
अंबड : बँक आणि ग्राहकांचे नाते हे विश्वासावर आधारित असले पाहिजे. खातेदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून बँकांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. त्यातूनच बँक आणि ग्राहकांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण होईल, असे प्रतिपादन माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. शहरातील झंवर मंगल कार्यालयात समर्थ सहकारी बँक व यशवंत सहकारी सूतगिरणीच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, माजी उपाध्यक्ष सतीशराव टोपे, समर्थ बँकेचे अध्यक्ष आबासाहेब वरखडे, डॉ. बाबासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष संजय कनके, महाव्यवस्थापक विजय कनुजे, तज्ज्ञ संचालिका बिजल भायानी, चेअरमन अरुणराव कळकटे उपस्थित होते.
समर्थ सहकारी बँकेने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वाधिक कर्जवाटप केले आहे. कर्जदारांनी बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेत परतफेड करून आपली पत वाढविणे महत्त्वाचे आहे, असेही टोपे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) जिल्हाध्यक्ष ॲड. संजय काळबांडे, नंदकुमार देशमुख, माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, सतीश होंडे, डॉ. भागवतराव कटारे, खरेदी-विक्री संस्थेचे चेअरमन बाळासाहेब नरवडे आदी उपस्थित होते.