पान १ लीड
----
कंडक्टर म्हणतोय, फुल तिकीट काढा, नाहीतर खाली उतरा
हातात एनसीएमसी कार्ड, पण मशीन बंद; महिलांसह ज्येष्ठांची ससेहोलपट
----
बीड, ता. ३ : सकाळचे नऊ वाजले आहेत. बीड बसस्थानकावर एका वृद्ध आजीच्या हातात शासनाचे ‘स्मार्ट’ कार्ड आहे. तिला गावी जायचे आहे, पण एसटीच्या काउंटरवर सर्व्हर डाऊनची पाटी झळकत आहे. तासन् तास रांगेत उभे राहूनही तिचे कार्ड रिचार्ज होत नाहीये आणि नाइलाजाने बसमध्ये गेल्यावर वाहक ‘फुल तिकीट काढा, नाहीतर खाली उतरा’ असे सुनावतोय... हे विदारक चित्र केवळ एका आजीचे नाही, तर बीड जिल्ह्यातील हजारो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे आहे.
डिजिटल आणि स्मार्ट महाराष्ट्राचा गवगवा एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अक्षरशः हवेत विरून गेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ सप्टेंबरपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले खरे, मात्र योग्य नियोजनाअभावी या सक्तीचा पुरता फज्जा उडाला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही बीड जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल सुरूच असून, कार्ड असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांची झाली आहे.
सवलतीसाठी महामंडळाने कार्डची सक्ती केली; परंतु ते रिचार्ज करण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा आणि वाहकांच्या मशीन अपडेटच केल्या नसल्याने प्रवाशांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. बीड बसस्थानकासह जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, आष्टी, अंबाजोगाई व इतर आगारांमध्ये कार्ड रिचार्ज करण्यासाठी तुटपुंजे काउंटर्स उभारण्यात आले आहेत. त्यातच सकाळी ९ वाजेपासूनच महामंडळाचा सर्व्हर डाऊन झाल्याने रांगेत उभे असलेले ज्येष्ठ नागरिक आणि महिला चक्क ४ ते ५ तास ताटकळत उभे होते.
एसटी महाव्यवस्थापकांनी ३१ ऑगस्ट रोजी पाठवलेल्या परिपत्रकात वाहकांनी स्वतःच्या मशीनद्वारे कार्ड टॉपअप (रिचार्ज) करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. परंतु, बीड विभागातील वाहकांच्या तिकीट मशीनमध्ये ते ऑप्शनच अपडेट करण्यात आलेले नाही. जर मशीनमध्ये सोयच नव्हती, तर मग हे कार्ड प्रवाशांच्या गळ्यात कशाला बांधले? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
-------
सवलतधारकांकडून पूर्ण तिकीट वसुली
वरिष्ठांच्या स्पष्ट आदेशानुसार १४ सप्टेंबरपर्यंत ज्यांचे कार्ड रिचार्ज नाही किंवा ज्यांच्याकडे नोंदणी पावती आहे, त्यांना आधार कार्ड पाहून सवलतीचे तिकीट देणे बंधनकारक आहे. परंतु, बीड विभागात या नियमाला हरताळ फासला जात आहे. कार्डमध्ये बॅलन्स नाही किंवा मशीन चालत नाही असे सांगून वाहक महिला व ज्येष्ठांना थेट बसमधून खाली उतरवत आहेत. प्रवास तातडीचा असल्याने अनेक प्रवाशांना नाइलाजाने सवलत सोडून पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागत आहेत. या प्रकारामुळे बसेसमध्ये रोज प्रवासी आणि वाहकांमध्ये तीव्र वादंग पेटत आहेत.
------
सर्व्हर डाऊनमुळे प्रवाशांचा संताप अनावर
एसटी महामंडळाने डिजिटल कार्डची सक्ती केली, पण तांत्रिक बाजू सक्षम केली नाही. बीडसह सर्वच आगारांमध्ये सर्व्हर सतत डाऊन राहत असल्याने कार्ड रिचार्जचे काम ठप्प झाले आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही काम होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे सवलतीचा आनंद मिळण्याऐवजी प्रवाशांच्या वाट्याला केवळ मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड आला आहे.
-------
कोट
मी सकाळी ९.०० वाजेपासून काउंटरवर रांगेत उभा आहे. गावाला जायचे आहे; परंतु सर्व्हर डाऊनमुळे कार्ड रिचार्ज करता आले नाही. तासन् तास ताटकळावे लागत आहे.
- राम आघाव, प्रवासी
-------
गेवराईत रिचार्जची मशीन बंद होती. फुल तिकीट काढून बीडला आले. आता परत गेवराईला जायचे तर बीडमध्येही रिचार्ज बंद आहे. त्यामुळे त्रास झाला तसेच फुल तिकिटाचा भुर्दंड बसला.
- राधा पवार, प्रवासी
------
पत्नीला बीडमध्ये दवाखान्यात आणले. येताना तिचे फुल तिकीट काढावे लागले. आता इथे रिचार्ज करायचे दोन तासांपासून काम बंद आहे. माझ्यासह प्रवाशांचा वेळ वाया चालला. हाच आहे का महिला सन्मान?
- शोभा जाधव, प्रवासी
------
वरिष्ठांच्या आदेशानुसार १ सप्टेंबरपासून सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे, हे खरे आहे. ही समस्या वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात आली असून, मशीन अपडेट करण्याचे व सर्व्हर सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच ही सेवा पूर्ववत होईल.
- निलेश पवार, आगार प्रमुख, बीड