एआय फोटो ABD26J79198
---
पान एक लीड
---------
शिवारात करपतेय पीक
अन् नेत्यांना ‘एआय’ फोटोंची झिंग!
बीडचा बळिराजा संकटाच्या खाईत;
लोकप्रतिनिधी डिजिटल धुंदीत मस्त
मदतीचा हात देण्याऐवजी लाइक्स-कमेंट्सचा हव्यास
कॅमेऱ्याच्या कौतुकात व्यस्त नेत्यांविरोधात तीव्र संताप
बीड, ता. १२ : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळिराजाच्या नशिबी पुन्हा एकदा कोरड्या दुष्काळाचे चटके आले आहेत. ऐन खरिपाच्या हंगामात पावसाने दिलेल्या दगाफटक्यामुळे बीड जिल्ह्यातील पिके डोळ्यांसमोर करपून खाक होत आहेत. विहिरी कोरड्या पडल्या आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकरी जगण्यासाठी आणि शासनाच्या मदतीसाठी तडफडत असताना, जिल्ह्याचे राजकीय धुरंधर मात्र भलत्याच धुंदीत वावरताना दिसत आहेत.
शेतात जाऊन सुकलेल्या पिकांचे पंचनामे करण्याऐवजी आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी, आमचे नेते आणि लोकप्रतिनिधी सोशल मीडियावर स्वतःचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बनवलेले चकचकीत फोटो पोस्ट करण्यात आणि ट्रेंडिंग राहण्याच्या शर्यतीत गढून गेले आहेत. बळिराजा संकटाच्या दलदलीत रुतलेला असताना लोकप्रतिनिधींची ही डिजिटल हवाबाजी पाहून बीडच्या सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र चीड व्यक्त केली जात आहे.
सध्या सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे स्वतःचे दाक्षिणात्य अभिनेत्यांसारखे किंवा काल्पनिक योद्ध्यांसारखे फोटो बनवून ते पोस्ट करण्याचा धुमाकूळ सुरू आहे. मंत्री, खासदार, आमदारांपासून ते गल्लीबोळातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण या आभासी जगात हीरो बनण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामवर या एआय फोटोंवर लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या टोळ्या रात्रंदिवस राबत आहेत. परंतु, अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, यापैकी एकाही लोकप्रतिनिधीने सुकलेल्या पिकाच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्याच्या डोळ्यांतील पाणी आणि करपलेल्या सोयाबीन-कपसाचे वास्तव मांडणारा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे का, असा रोखठोक आणि बोचरा सवाल आता बीडचा शेतकरी विचारत आहे.
प्रत्यक्ष शेतात जाऊन काम करण्यापेक्षा आणि प्रशासनाला धारेवर धरण्यापेक्षा केवळ डिजिटल जगात रीलस्टार बनण्याचा हा प्रकार म्हणजे बळिराजाच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे. कॅमेऱ्याचे कौतुक, एआय फोटोंचा झगमगाट आणि कार्यकर्त्यांची खोटी वाहवा यातून लोकप्रतिनिधींनी आता लवकरात लवकर बाहेर पडावे. सोशल मीडियावरील या आभासी विश्वातून बाहेर येऊन वास्तविक जगात उघड्या डोळ्यांनी शेतकऱ्यांचे हाल पाहावेत. जर वेळेत बीड जिल्ह्यातील बळिराजाला मदतीचा हात दिला नाही, दुष्काळी सवलती लागू केल्या नाहीत आणि पिकांचे पंचनामे करून भरपाई दिली नाही; तर आगामी काळात बीडची हीच जनता या ट्रेंडिंग नेत्यांना जमिनीवर आणल्याशिवाय आणि त्यांची राजकीय गणिते बिघडवल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा जिल्ह्यातील शेतकरी आणि सुजाण नागरिकांनी दिला आहे.
चौकट
लागवडीचा खर्च पाण्यात; समोर कर्जाचा डोंगर
यंदा खतांचे, बियाणांचे आणि मशागतीचे अफाट दर सोसून शेतकऱ्यांनी कसाबसा पेरणीचा खर्च केला. मात्र, पावसाने दडी मारल्याने लागवडीचा संपूर्ण खर्च मातीमोल झाला आहे. बँकेचे हप्ते आणि सावकारांचे देणे कसे फेडायचे, या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अशा भीषण आणीबाणीच्या काळात लोकप्रतिनिधींनी तत्काळ शेताची पाहणी करणे, दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनावर दबाव आणणे, विमा कंपन्यांना टांगणीला लावून भरपाई मिळवून देणे आणि प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून घेणे अपेक्षित होते. मात्र, नेत्यांना जनतेच्या या मूळ आणि ज्वलंत प्रश्नांचे कसलेच सोयरसुतक उरलेले नाही, हेच या सर्व प्रकारातून स्पष्ट होत आहे.
चौकट
लाइक्सच्या शर्यतीत बळिराजाचा बळी
सोशल मीडियावरील आभासी लाइक्स आणि व्ह्यूजची संख्या भलेही हजारो-लाखोंमध्ये जात असेल, परंतु शिवारात सुकणाऱ्या पिकांची आणि कोमेजणाऱ्या चेहऱ्यांची चिंता दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली आहे. राजकीय फुशारक्या मारण्यात आणि स्वतःचे उदात्तीकरण करण्यात गुंग असलेल्या नेत्यांना बळीराजाच्या जगण्याच्या संघर्षाचा साफ विसर पडला आहे. जनतेचे सेवक म्हणवून घेणारे नेते आज जनतेच्या वेदनांपासून हजारो मैल दूर निघून गेले आहेत.
चौकट
एआय फोटो अन् रील्सची हौस; बांधावर जायला वेळ कुणाकडे?
सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने स्वतःचे काल्पनिक, रुबाबदार फोटो आणि रील्स बनवून पोस्ट करण्याची नेत्यांमध्ये जणू चढाओढच लागली आहे. डिजिटल जगात हीरो ठरण्याच्या या हव्यासापोटी वास्तविक जगात सुकणाऱ्या पिकांचा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा लोकप्रतिनिधींना पूर्णपणे विसर पडला आहे. लाखांचे लाइक्स मिळवणाऱ्या नेत्यांना बांधावर जाऊन बळिराजाचे अश्रू पुसायला वेळ उरलेला नाही, ही शोकांतिका आहे.
कोट
पिके जळून खाक झाली आहेत, पाण्याचा थेंब नाही. आमदारांना सोशल मीडियावर एआय फोटो टाकून हीरो बनण्याची हौस सुटली आहे. आमच्या उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे फोटो टाकून शासनाकडून भरपाई मिळवून द्यायला यांच्याकडे वेळ नाही का?
- रामराव जगताप, शेतकरी
कोट
नेते आणि त्यांचे कार्यकर्ते लाइक्स-कमेंट्सच्या खेळात मस्त आहेत. शेतात कंबरडे मोडले तरी पंचनामे करायला अधिकारी फिरकत नाहीत. निवडणुका आल्या की पाया पडतील, पण आज संकटाच्या वेळी हे डिजिटल हवेतच तरंगत आहेत.
- कारभारी सानप, शेतकरी