
औरंगाबाद : बीएसएनएलचे बनावट प्रमाणपत्र बाळगत विविध शहरांत बीएसएनएलची भूमिगत केबल पळवणाऱ्या टोळीत पोलिसांनी अटक केलेले बहुतांश मजूर आहेत. टोळीतील म्होरक्याने बीएसएनएलचे कंत्राट मिळाल्याचे सांगत मजुरांना कामासाठी आणले होते. अटकेतील या मजुरांनी पोलिसांच्या जबाबात ही माहिती दिली आहे. मात्र, तरीही पोलिसांकडून खात्री करण्याचे काम सुरू आहे.
भारत संचार टेलिफोन निगम लिमिटेडचे बनावट प्रमाणपत्र सोबत बाळगून या टोळीने देशभरातील विविध शहरांत ऑप्टिकल फायबर केबलच्या चोऱ्या केल्या आहेत. बीएसएनएलतर्फे भूमिगत केबलच्या झालेल्या कामाची रेकी करून त्या ठिकाणाहून मजुरांच्या मदतीने जमीन खोदून केबल चोरणाऱ्या दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या १६ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शनिवारी (ता. पाच) सायंकाळी प्रतापनगर स्मशानभूमीजवळ अटक करण्यात आली. यावेळी तिघेजण पसार झाले. तर दोन जण विधिसंघर्ष बालके आहेत.
३१ डिसेंबर रोजी जालना रोडवरील अमरप्रीत चौक ते काल्डा कॉर्नर भागात भूमिगत बीएसएनएलचे वीस लाखांचे केबल लांबविले होते. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी टोळीचा म्होरक्या साकीब गयासुद्दीन याने महाराष्ट्रात फोनचे केबल वायर काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे. असे सांगत आम्हाला येथे आणले, आम्ही तर मजूर म्हणून कामे करतो असा जबाब अटकेतील व्यक्तींनी पोलिसांना दिला आहे. मात्र, पोलिस या जबाबाची खात्री करत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रत्येक मजुराला ठेकेदाराचे काम सुरू असते त्याप्रमाणे हेल्मेट, अंगातील जॅकेट व साहित्य पुरविल्यामुळे कुणालाही हे चोरटे असतील अशी साधी शंकाही येत नव्हती.
मजुरांना आणले दिल्लीतून साकीब गयासुद्दीन याने बीएसएनएलच्या पत्राची कलर झेरॉक्स दाखवून काम मिळाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या पत्राची पाहणी केली असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी साकीबला खाक्या दाखवताच, त्याने साथीदारांच्या मदतीने विविध शहरांमध्ये ज्या ठिकाणी बीएसएनएलच्या केबलचे काम झाले आहे. त्याचा शोध घेत परिसराची रेकी केल्यानंतर क्रेन त्याच शहरात भाड्याने घेत थेट दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील दिल्ली येथून आलेल्या मजुरांच्या मदतीने चोरलेली केबल टेम्पोत टाकून दिल्ली गाठली जायची. आरोपींनी अशा प्रकारे चंडीगड आणि इतर राज्यांतही चोरी केल्याचे, तसेच औरंगाबादेत महिन्याभरापूर्वी देखील अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची कबुली देखील त्याने दिली.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली आयशर टेम्पो, कार आणि इतर साहित्य असा सुमारे ३२ लाख ९१ हजार १० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या अटक केलेल्या १६ आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात सहायक सरकारी वकील अर्चना लाटकर यांनी युक्तिवाद केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.