कृषिपंपांच्या केबल चोरांचा सुळसुळाट
-
पोलिसांना रात्रीची गस्त वाढवावी; शेतकऱ्यांची मागणी
फुलंब्री, ता. १९ (बातमीदार) : शहरासह परिसरातील ग्रामीण भागात शेतातील विद्युत मोटारींचे केबल चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे विहिरी, बोअरवेल आणि सौरपंपांना जोडलेले महागडे तांब्याचे केबल कापून लंपास करीत आहेत.
मागील काही दिवसांत या घटनांत मोठी वाढ झाली असून, आधीच वाढत्या मशागत खर्चाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर ऐन हंगामात अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडत आहे. सकाळी शेतात पाणी देण्यासाठी गेल्यावर केबल चोरीला गेल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर पिकांना वेळेवर पाणी देण्याचे नियोजनही पूर्णपणे कोलमडत आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे काही शेतकऱ्यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, ही टोळी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शेतशिवारात रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची तसेच चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
प्रतिक्रिया
केबल चोरीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने शेतशिवारात गस्त वाढविण्यात आली असून, विशेष पथकही तैनात केले आहे. लवकरच या चोरांचा छडा लावून त्यांना गजाआड केले जाईल.
- डॉ. सोनाली पाईकराव,
परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक, फुलंब्री
प्रतिक्रिया
शेतातील सौरपंपाचे केबल रात्री अंधारात चोरट्यांनी कापून नेल्याने माझे सुमारे साडेचार हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तातडीने तपास करून चोरांचा बंदोबस्त करावा.
- सुभाष उबाळे,
बाधित शेतकरी, फुलंब्री