Jalna News : दुष्काळ पाहणीसाठी येणार केंद्रीय पथक

तीन तालुक्यांना देणार भेट : समितीमध्ये दोन सदस्य, तब्बल ८९ टँकर सुरू
jalna
jalnaSakal
Updated on

जालना : जिल्ह्यातील आठ पैकी पाच तालुके दुष्काळग्रस्त तर तीन तालुके दुष्काळ सदृश म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहेत. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक बुधवारी (ता.१३) जिल्ह्यात येणार आहे. हे पथक बुधवारी (ता.१३) आणि गुरूवारी (ता.१४) अंबड, बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात भेटी देणार आहे. दरम्यान जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरवात झाली असून आज घडीला तब्बल ८९ टँकरव्दारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात यंदा अल्प पाऊस झाल्याने खरीप पिके वाया गेली आहेत. शिवाय रब्बी पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. शिवाय जिल्ह्याची पाणी पातळी दोन ते अडीच मीटरने खालावली आहे. त्यामुळे भर हिवाळ्यात पाणी टंचाईचे संकट येऊन ठेपले आहेत. परिणामी ४२ गावे आणि २४ वाड्यांवरील एक लाख ४५ हजार ५३३ ग्रामस्थांना ८९ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शिवाय सात मध्यम आणि ५७ लघू प्रकल्पांत केवळ ८.०९ टक्के पाणीसाठा असल्याचा पाटबंधारे विभागाचा मागील आठवड्यातील अहवाल आहे.

कमी पर्जन्यमान, जमिनीच्या पाणी पातळीत झालेली तूट आदी बाबींच्या आधारे राज्य शासनाकडून आठ तालुक्यांपैकी जालना, बदनापूर, भोकरदन, मंठा आणि अंबड हे पाच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. तर जाफराबाद, परतूर आणि घनसावंगी तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती राज्य शासनाने जाहीर केली आहे.

या आठ पैकी अंबड, बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात बुधवार व गुरूवारी हे केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार आहे. या पथकात हरीश उंब्रजे आणि डॉ.एल. एल. वाघमारे या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांत निकषाप्रमाणे परिस्थिती आहे, की नाही? याची पाहणी हे पथक दोन दिवस करणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाला या दुष्काळ पाहणीचा अहवाल सादर केला जाणार आहे. या समितीच्या अहवालानुसार केंद्राकडून दुष्काळी मदत किती आणि कधी येणार हे ठरणार आहे.

जिल्ह्यात जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यांचे पथक जिल्ह्यात येणार आहे. हे पथक अंबड, भोकरदन, बदनापूर या तालुक्यांना भेट देऊन हे तालुके दुष्काळग्रस्त आहेत की नाही, याची पडताळणी करणार आहेत. बुधवारी किंवा गुरूवारी हे पथक जिल्ह्यात येईल.

— डी.आर. कापसे, कृषी अधीक्षक, जालना.

निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. यंदाही जेमतेम पावसावर आलेली कपाशी, मका, सोयाबीनसह हरभरा ही पिके अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना तत्काळ ठोस मदत द्यावी.

— कमलबाई जाधव, शेतकरी, ताडकळस,ता. भोकरदन

जिल्ह्यात सुरू असलेले तालुका निहाय टँकर

तालुका लोकसंख्या गाव वाड्या टँकर संख्या टँकर खेपा

  • जालना ३२,२४६ ०९ ०५ २० ४८

  • बदनापूर ४२,१९६ १२ ०८ १७ ३७

  • भोकरदन २३,३४९ १४ ०४ १८ ४८

  • भोकरदन (शहर) ३२,६८० ०१ ०० २५ ५०

  • मंठा १,२५० ०१ ०१ ०१ ०२

  • अंबड २,७०० ०१ ०० ०१ ०२

  • घनसावंगी ११,११२ ०५ ०६ ०७ १४

  • एकूण १,४५,५३३ ४२ २४ ८९ १९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com