धक्कादायक! दहावीच्या या निर्णयामुळे राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांचे होणार नुकसान

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. रद्द झालेल्या त्या पेपरला आता इतर सहा विषयांत पडणाऱ्या लेखी गुणांच्या सरासरीनुसार गुण देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र, यामुळे राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. म्हणून जे गुण इतिहास विषयाला मिळाले तेच गुण भूगोल विषयाला देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे. विद्यार्थ्यावर अन्याय झाल्यास न्यायालयीन प्रकरणे उपस्थित होतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
 
भूगोलाचा पेपर २३ मार्चला होता. कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन घोषित झाले. मंडळाने २७ मे रोजी इतर सहा विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या सरासरीनुसार विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यावर पालक, शिक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे. या निर्णयामुळे मेरीट विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होणार आहे. बोर्डाच्या नियमानुसार अनवधानाने उत्तरपत्रिका गहाळ झाली, फाटली, स्पष्ट न दिसणे अथवा जळाली तर त्यांना सरासरी गुण देण्याचा नियम आहे. 

परंतू, कोरोनाच्या कारणामुळे सरासरी गुण देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. त्यापेक्षा जे गुण इतिहास विषयाला मिळाले तेच संपूर्ण गुण भूगोल या विषयास देण्यात यावेत. दहावीचा निकाल लागण्यापुर्वी यामध्ये तातडीने लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, बच्चू कडू, शालेय शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. 

भूगोल सरासरी गुणदान पद्धत 
राज्य मंडळाच्या सरासरी गुणदान पद्धतीप्रमाणे प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा, विज्ञान, गणित प्रत्येक विषय ८० गुण; तर इतिहास व भूगोल प्रत्येकी ४० गुणांचे पेपर आहेत. या सर्व विषयांच्या गुणांचा गुणाकार करण्यात येणार असून या गुणाकाराला ४४० ने भागून येणारे सरासरी गुण भूगोलाला देण्यात येणार आहेत. या गुणदान पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फक्त १८ ते २२ गुण मिळणार आहेत. 


सरासरी गुण देण्याचा नियम उत्तरपत्रिका गहाळ होणे, फाटणे, स्पष्ट न दिसणे, जळणे या कारणांसाठी घेतला जातो. परंतु राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकटामुळे पेपर देता आला नाही, यासाठी सरासरीचा नियम योग्य आहे का? म्हणून समाजशास्त्रातील इतिहास या विषयाला मिळालेल्या गुणांच्या तुलनेत समान गुण देण्यात यावेत. 
-वाल्मिक सुरासे (विभागीय कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ) 
-- 


भूगोल विषयासाठी राज्यमंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळाने काढलेला फार्म्युला हा इतर विषयांत घेतलेल्या गुणांवरुन असल्याने समतोल साधणारा आहे. त्यामुळे हा निर्णय अंतिम राहाणार आहे. 
-आर. पी. पाटील, सहसचिव, औरंगाबाद विभागीय मंडळ, 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com