
औरंगाबाद |आधी मैत्रिणीचा खून केला.. मग स्वत:च घेतला गळफास
औरंगाबाद : नारेगाव भागातील राजेंद्रनगरात एका १९ वर्षीय तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. या तरूणीचा खून करणाऱ्या तीच्या मित्रानेही शुक्रवारी (ता. वीस) सकाळी गोपालनगरातील एका शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. शंकर विष्णू हागोने (वय २५) असे आत्महत्या केलेल्या मित्राचे नाव असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
शंकर राजेंद्रनगरात दोन-तीन मित्रांसोबत किरायाच्या खोलीत राहात होता. बुधवारी सायंकाळी त्याचे मित्र कामानिमित्त बाहेर पडताच त्याने त्याच्या १९ वर्षीय मैत्रीणीला खोलीवर बोलावून घेतले. ती आल्यानंतर काही वेळातच दोघांमध्ये भांडण झाले. यातूनच रागाच्या भरात मृत तरुणीच्या डोक्यात प्रथम वार केला व त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी काही पथकेही रवाना केली होती. मात्र शुक्रवारी सकाळी शंकरने गोपालनगरात एका शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. शंकर हा मूळचा वाशीम जिल्ह्यातील रहिवासी असून तो नारेगाव भागात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली.
Web Title: Crime News Friend Murder His Girlfriend And Commit Suicide Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..