पावसाच्या खंडकाळात
पीक व्यवस्थापन गरजेचे
कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ५ ः पावसाच्या खंडकाळात कोणतीही उपाययोजना सर्व पिकांसाठी किंवा सर्व शेतांसाठी एकसारखी लागू होत नाही. पिकाची वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, सिंचनाची उपलब्धता, पिकाची सद्यःस्थिती आणि स्थानिक हवामान परिस्थिती यांचा विचार करूनच शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी केले आहे.
मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड आणि बदलत्या हवामान परिस्थितीमुळे पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन त्याचा पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर तसेच पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाच्या खंड काळात उपलब्ध जमिनीतील ओलावा, पाणी, अन्नद्रव्ये आणि चारा यांचे काटकसरीने व कार्यक्षम व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजनांचा सल्ला कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले अखिल भारतीय कोरडवाहू प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे, डॉ. मधुकर मोरे, डॉ . गणेश गायकवाड, डॉ. पपीता गौरखेडे यांनी दिला आहे.
उपलब्ध साधनसंपत्तीचा करा कार्यक्षम वापर
पावसाचा खंड म्हणजे केवळ संकट नव्हे तर योग्य नियोजन, उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन, काटकसरीचे सिंचन, जलसंधारण, पीक संरक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पशुधनासाठी चारा नियोजन यांच्या माध्यमातून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. विशेषतः अन्नद्रव्यांची फवारणी, कीटकनाशके, बुरशीनाशके, जैविक निविष्ठा, बोर्डोपेस्ट तसेच चारा प्रक्रिया यांचा वापर संबंधित पिकासाठी कृषी किंवा पशुसंवर्धन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावा. उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करा, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा आणि पिके व पशुधनाचे शाश्वत व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.