ज्ञानप्रकाश प्रकल्पात सायबर सुरक्षा कार्यशाळा
लातूर, ता. १६ : ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात क्विक हील फाउंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या प्रकल्पातील प्रार्थना सभा ‘विचारसभा’ म्हणून ओळखली जाते. या सभेत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, पर्यावरण व आरोग्यविषयक बाबींवर संवादात्मक चर्चा केली जाते.
सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून, त्यात सातत्याने बदल होत आहेत. समाजमाध्यमांचा वापर करताना कळत-नकळतपणे अनेकजण फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे आर्थिक तसेच मानसिक नुकसान होण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
राजर्षी शाहू महाविद्यालयातील साहिल जाधव, परमेश्वर पांढरे, नेहल बुलाणी व नम्रता तावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींशी समाजमाध्यमांवर मैत्री करताना किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे नेहल बुलाणी यांनी सांगितले. समाजमाध्यमांवरील अशा संपर्कातून अनेकदा फसवणूक होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली. साहिल जाधव यांनी खेळकर पद्धतीने गेमिंग, पासवर्ड आणि ऑनलाइन सुरक्षिततेतील बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेची शपथ घेतली. यावेळी मुख्याध्यापक तथा संचालक सविता नरहरे उपस्थित होत्या.