‘स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा’
धाराशिव : जातवैधता प्रमाणपत्राच्या कामकाजासाठी एका अधिकाऱ्यावर एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचा कार्यभार असल्याने धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी विलंब होत आहे. जिल्ह्यासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली. शिक्षण प्रवेश, शिष्यवृत्ती व विविध शासकीय योजनांसाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतंत्र अधिकारी तसेच पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करावा, अशी मागणी करण्यात आली.
.................
अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी
तुळजापूर : तालुक्यातील अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रवींद्र साळुंके यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे केली आहे. फसवणूकप्रकरणी १० फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतरही संबंधित ठिकाणी जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार साळुंके यांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अवैध व्यवसायामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
............
शिराढोणच्या शिबिरात एकही अर्ज नाही
शिराढोण : कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी मंडळ स्तरावर आयोजित शिबिरात कुणबी नोंदी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अर्ज करता आला नाही. शिराढोण महसूल मंडळातील शिबिराला त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कळंब तालुक्यात ६५१ तर वाशी तालुक्यात २० कुणबी नोंदी आढळल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, काही गावांत नोंदीच उपलब्ध नसल्याने पात्र नागरिकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. केवळ शिबिरे घेण्याऐवजी जुन्या महसुली अभिलेखांतील नोंदी शोधून नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, तसेच विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
...............
विद्यार्थ्यांसोबत चौगुले यांचा संवाद
तुरोरी : श्री ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास पंचायत समितीच्या सभापती आकांक्षा चौगुले यांनी सदिच्छा भेट देऊन इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, भविष्यातील ध्येय व ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. विद्यार्थ्यांशी सुमारे दीड तास मनमोकळा संवाद झाला. शाळेसाठी सोलर पॅनल व प्युरिफाइड वॉटर फिल्टरची सुविधा १५ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. ज्ञानज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचेही सांगण्यात आले. प्राचार्या एस. एम. अहिरे यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
..................
मुरूम येथील विद्यार्थिनींचे यश
मुरूम : तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत भारत शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनींनी विजय मिळविला. कृतिका इंगोले, साक्षी कुंचगे, अपसाना कुरणे, तेजस्विनी खजूरे आणि तस्लिम जमादार यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. कौशल्य, चिकाटी आणि सांघिक भावनेच्या जोरावर संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले, क्रीडा विभागप्रमुख बालाजी इंगोले, कर्मचारी व क्रीडाप्रेमींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
...............
आजीवन अध्ययन केंद्राचे उद्घाटन
कळंब : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दुग्ध व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नऊ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रा. डॉ. अश्विन रांजणीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ग्रामीण पत्रकारिता, ग्रंथालय व्यवस्थापन, इंग्रजी संवाद कौशल्य तसेच दुग्ध व्यवसायासारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कौशल्य व रोजगाराच्या संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हेमंत भगवान होते. प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
...............
पावसाच्या खंडामुळे सोयाबीन करपले
भूम : पावसाच्या दीर्घ खंडामुळे माणकेश्वर परिसरातील शेतकरी अनुसया विष्णू अंधारे यांच्या दहा एकर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. पेरणीपासून आतापर्यंत एकरी सुमारे १२ हजार रुपये खर्च झाला असून, एमजीबी बँकेचे १ लाख ७० हजार रुपये कर्ज आणि सुमारे एक लाख रुपये हातउसने आहेत. फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाऊस न झाल्याने पीक करपले असून, रोटर फिरवण्याची वेळ आली आहे. उत्पादनाची शक्यता कमी झाल्याने कर्जफेडीची चिंता वाढली आहे. पंचनामे, नुकसानभरपाई, पीकविमा व विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
................
ईट येथे सभामंडपाच्या कामाला सुरवात
ईट : श्रीक्षेत्र बेलेश्वर येथील वासुदेव स्वामी समाधीसमोरील सभामंडपाच्या कामाचा सुरवात करण्यात आली. अंबुजा सिमेंटचे विक्रेते पद्माकर चव्हाण यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रसाद गोसावी, समाधान नाईक, बाबूराव पाटील, गुत्तेदार कुंडलिक नाईक, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव चव्हाण, रमेश चव्हाण, बबन पाटील आदी उपस्थित होते. धार्मिक स्थळाच्या परिसरातील सुविधेत या सभामंडपाची भर पडणार आहे. उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे स्वागत केले.
............
पंचनामे रखडल्याने शेतकऱ्यांचा सवाल
भूम : पावसाच्या दीर्घ खंडामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. सोयाबीनसह खरीप पिकांना उत्पादनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाचा फटका बसला आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर खर्च करूनही उत्पादनाची शक्यता कमी झाल्याने कर्जफेडीची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील परिस्थितीची वरिष्ठ समितीने पाहणी केली. मात्र, त्यानंतर पंचनामे व नुकसान नोंदणीबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. प्रत्येक गावातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे, नुकसानभरपाई, पीकविमा व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
...............
चारा-पाण्यासाठी मेंढपाळांचे स्थलांतर
लोहारा : पावसाअभावी मराठवाड्यासह कर्नाटकातील काही भागांत चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे विजापूर परिसरातील मेंढपाळ शेकडो मेंढ्यांचे कळप घेऊन चारा-पाण्याच्या शोधात लोहारा तालुक्यात दाखल झाले आहेत. तालुक्यात सोयाबीन, उडीद व मूग पिके सुकल्याने शेतशिवारात हिरवा चारा उपलब्ध नाही. मेंढपाळ दिवसभर शेतशिवार, माळरान व रस्त्यालगत कळपासाठी चारा शोधत असून, रात्री मिळेल त्या ठिकाणी मुक्काम करीत आहेत. त्यांच्यासोबत कुटुंबीय व संसारोपयोगी साहित्य असल्याने हे स्थलांतर केवळ मेंढ्यांचे नसून चारा-पाण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची भटकंती ठरली आहे.