धाराशिवः बांधकाम करून पंचायत समितीचे एका बाजूचे बंद करण्यात आलेले प्रवेशद्वार. OSM26B07037
धाराशिव ः पंचायत समितीच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ टाकण्यात आलेल्या विटा. OSM26B07038
-----------------
पान एक लीड
---
पंचायत समिती रस्ता बंद करण्याचा प्रयत्न
धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेचा प्रताप; युवा सेनेकडून काम पाडले बंद
धाराशिव : राष्ट्रीय महामार्गावरून पंचायत समितीकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराची शुक्रवारी (ता. १८) रात्री भिंत बांधून अचानक बंदिस्त करण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, महामार्गापासून समतानगरकडे जाणाऱ्या नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरही रस्ता बंद करण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेकडून सुरू असल्याचा आरोप करत, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्रीच घटनास्थळी धाव घेत हे काम आक्रमकपणे बंद पाडले.
शहरातील उंबरे कोठापासून समतानगर भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून याच रस्त्याचा वापर राष्ट्रीय महामार्गावर ये-जा करण्यासाठी करतात. या मार्गावरून महामार्गावर आल्यानंतर नागरिकांना जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख, नगरपालिका, न्यायालय आणि स्टेट बँक यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये जाणे अत्यंत सोयीचे ठरते.
यापूर्वीही झाले होते वाद
या रस्त्यावरून प्रशासन आणि नागरिक-पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी समतानगर बाजूकडील या रस्त्यावर दोन वेळा तारेचे कुंपण घालण्यात आले होते; मात्र शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी ते तात्काळ हटवले होते. याशिवाय, दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेची दोन भंगार वाहने क्रेनच्या साहाय्याने आणून हा रस्ता अडवण्यात आला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी ती वाहने हटवून थेट जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर उभी करत प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला होता.
प्रशासनाचा मनमानी कारभार?
आता दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ विटा व बांधकामाचे साहित्य आणून ठेवण्यात आले आहे. एका बाजूचे प्रवेशद्वार भिंत बांधून आधीच बंद करण्यात आले असून, दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळही साहित्य आल्यामुळे हेद्वारही बंद केले जाणार की केवळ दुरुस्ती केली जाणार, याबाबत अस्पष्टता आहे. यावरून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कोट
हे काम जिल्हा परिषद बांधकाम उपविभागामार्फत एका कंत्राटदाराला देण्यात आले असून, संबंधित कार्यारंभ आदेशावर तारीख आणि जावक क्रमांकही नमूद नाही. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगरपालिकेकडून एक कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचा कार्यारंभ आदेशही जारी झाला आहे. पालिकेने यावर भुयारी गटार योजनेचे कामही पूर्ण केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्यास तो तीव्र विरोध करून हाणून पाडला जाईल.
- रवी वाघमारे, जिल्हाप्रमुख, युवा सेना (उबाठा)