धाराशिववर भीषण पाणीटंचाईचे सावट
जिल्ह्यात केवळ ७.३५ टक्के उपयुक्त साठा; ४७ प्रकल्प कोरडे, १०४ जोत्याखाली
-----
धाराशिव, ता. १७ : पावसाने ओढ दिल्याने धाराशिव जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पाटबंधारे विभागाच्या गुरुवारच्या (ता. १७) अहवालानुसार जिल्ह्यातील २२५ प्रकल्पांमध्ये केवळ ५३.३०२ दलघमी म्हणजेच ७.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तब्बल ४७ प्रकल्प कोरडे पडले असून १०४ प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. तर ६० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २०१ प्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली आहे.
जिल्ह्यात सीना-कोळेगाव हा एक मोठा, १७ मध्यम आणि २०७ लघु व साठवण तलाव असे एकूण २२५ प्रकल्प आहेत. त्यापैकी ४७ प्रकल्प कोरडे, तर १०४ प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत. २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा असलेले ६०, २५ ते ५० टक्के साठा असलेले नऊ आणि ५० ते ७५ टक्के साठा असलेला केवळ एक प्रकल्प आहे. वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी सा.त. प्रकल्पात सर्वाधिक ७२.०७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठा क्षमता ७२५.४०१ दलघमी आहे. त्यापैकी सध्या अवघा ५३.३०२ दलघमी उपयुक्त साठा शिल्लक आहे. गतवर्षी याच काळात ६०९.१८७ दलघमी म्हणजे ८३.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.
-----
सीना-कोळेगाव कोरडे
सीना-कोळेगाव या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. १७ मध्यम प्रकल्पांत १३.३३४ दलघमी (६.४९ टक्के), तर लघु व साठवण तलावांमध्ये ३९.९६८ दलघमी (९.२८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
-----
योजनांवर परिणाम?
पाणीसाठा झपाट्याने घटल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील नळ पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता असून, पिण्याच्या पाण्याचे नियोजन प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. रब्बी हंगामासाठी सिंचनाला पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याने फळबागांसह रब्बी पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
-----
परतीच्या पावसाकडे लक्ष
शिल्लक पाणीसाठा मर्यादित असल्याने त्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढील काळात समाधानकारक परतीचा पाऊस झाला नाही, तर नोव्हेंबर-डिसेंबरपासून जिल्ह्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.