सरसकट हेक्टरी एक लाख भरपाई द्या
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा शेतशिवर पाहणी दौरा
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १९ : जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह विविध पिके आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना केवळ कागदी पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत, जिल्ह्यात तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.
नुकत्याच त्यांनी अंबेजवळगा आणि कौडगाव (ता. धाराशिव) शिवारात प्रत्यक्ष फिरून शेतशिवरांच्या नुकसानीची पाहणी केली, त्यावेळी ही गंभीर परिस्थिती समोर आली.
डोळ्यांसमोर नुकसान, तरीही पंचनाम्यांची प्रतीक्षा कशासाठी?
अंबेजवळगा व कौडगाव परिसरातील शेतात पाहणी केली असता, शेतकऱ्यांनी अक्षरशः जिवाचे रान करून उभे केलेले सोयाबीन व इतर पिके पार जळून खाक झाल्याचे दिसून आले. काढणीला आलेले पीक डोळ्यांसमोर वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक दुष्टचक्र उभे ठाकले आहे. पिकांसोबतच फळबागांनाही या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने ठोस आणि थेट मदत करण्याची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
या शेतशिवर पाहणी दौऱ्यादरम्यान रवी ठेंगल, ॲड. योगेश सोन्ने पाटील, ॲड. अविनाश जाधव, सूरज वडवले, राजू शिंदे, काका यादव, चंद्रकांत सुळ, काका शिंदे, अण्णा यादव, नेहाल पठाण, उमेश वायकुळे, अण्णा हाजगुडे, हनुमंत नाईकवाडी, विशाल थोरात, अक्षय नाईकवाडी, श्रीनिवास थोरात, माउली नाईकवाडी यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.