दुष्काळमुक्तीसाठी मतभेद विसरून एकत्र या
-
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महायुती पदाधिकाऱ्यांचे ‘कान टोचले’
वैजापूर, ता. ७ (बातमीदार) : वैजापूर तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत व आवश्यक तेवढा निधी देण्यास तयार आहे. मात्र, आमदारांचा कल एका दिशेला, डॉ. परदेशींचा दुसऱ्या दिशेला आणि संजय निकम यांचा तिसऱ्याच दिशेला असे करून चालणार नाही. तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र बसून ठोस आराखडा तयार करावा, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्थानिक नेत्यांचे कान टोचले.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त रविवारी (ता. सहा) शहरात आले असता ते बोलत होते. विखे म्हणाले, की तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. सर्व जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी २५ ते ४० गावांचा अभ्यास करून ठोस आराखडा सादर केल्यास हवी ती मदत करण्याची आपली तयारी आहे; मात्र त्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विखे यांच्या या परखड आवाहनामुळे वैजापूर तालुक्यातील महायुतीच्या अंतर्गत राजकीय मतभेदांची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली गेल्याचे स्पष्ट झाले. पाणीप्रश्नासह इतर विकासकामांसाठी नेत्यांनी किमान एका समान भूमिकेवर एकत्र येऊन नव्याने राजकीय मुहूर्तमेढ रोवावी, असाच स्पष्ट संदेश विखे यांच्या भाषणातून महायुतीच्या कार्यकर्त्यांना मिळाला.