मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा
---
माजी आमदार कव्हेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ९ ः लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाअभावी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत पेरण्या रखडल्या आहेत. पेरणी झालेल्या क्षेत्रातील सोयाबीनसह इतर खरीप पिकांवरही पावसाअभावी संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हिताचा गांभीर्याने विचार शासनाने करून ठोस मदत व उपाययोजना राबवाव्यात. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप २०२५ हंगामासाठी पीकविमा भरला असतानाही अनेक शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. ही भरपाई तातडीने द्यावी. पावसाअभावी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावरही पाणी फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लातूर शहरातील पाणीप्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
उजनीचे पाणी मांजरात आणा
-------
उजनी धरणातून पाणी मांजरा धरणात आणण्याच्या योजनेचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. ही योजना सुरू होऊ शकलेली नाही. ती सुरू करून उजनी धरणातील पाणी मांजरा धरणात आणावे. तसेच मांजरा धरणातून लातूरसाठी सुरू असलेल्या दुसऱ्या पाइपलाइनच्या कामाला गती द्यावी शहरातील उपलब्ध पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी नळजोडण्यांना मीटर बसविण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी कव्हेकर यांनी केली आहे.
----