दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या
---------------
खासदार जाधव यांची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.१२ : परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी व जालना जिल्ह्यांतील अनेक भागांत मागील ३५ ते ४० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रभावित भाग दुष्काळग्रस्त घोषित करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी असताना पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी यांसह विविध पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत असून शेतकऱ्यांसमोर उभे पीक वाचविण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत तसेच मजुरीवर केलेला मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याचे खासदार जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कर्जबाजारीपणा वाढण्यासोबतच शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुष्काळ जाहीर करावा, तातडीची आर्थिक मदत द्यावी, शासकीय योजनांचा लाभ द्यावा या मागण्या करण्यात आल्या आहेत. उभे पीक वाचविण्याची संधी दिवसेंदिवस कमी होत असल्याने शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता तातडीने निर्णय घ्यावा, संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार जाधव यांनी केली आहे.
------------