(लोगो ः भावनेचा इनबॉक्स))
ABD26J78393
(((फोटो ओळ)) छत्रपती संभाजीनगर ः ज्ञानप्रकाश विद्यामंदिर शाळेचा शिक्षकवृंद.
---
व्यस्ततेतही पालकांचे मुलांकडे नको दुर्लक्ष
---
ज्ञानप्रकाश विद्यामंदिरात शाळेच्या बदलत्या वातावरणावर शिक्षकांचे मंथन
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः ‘सध्याच्या बदलत्या सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतील वर्गांचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांचे वर्तन कमालीचे बदलले आहे. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांमधील वाढती आक्रमकता, मोबाइलचे व्यसन, नव्या तंत्रज्ञानामुळे कमी झालेली वाचनाची गोडी, कौटुंबिक असुरक्षितता आणि दुसरीकडे शिक्षकांवर लादली जाणारी अशैक्षणिक कामे यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी पालक-शिक्षकांमध्ये संवाद हवा’, असे मत ज्ञानप्रकाश शाळेतील शिक्षकांनी ‘सकाळ’च्या संवाद कार्यक्रमात मंगळवारी (ता. एक) व्यक्त केले.
शिक्षकांच्या अडचणी व प्रत्यक्ष अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’ने संवाद उपक्रम सुरू केला. त्यानिमित्त मंगळवारी ज्ञानप्रकाश विद्यामंदिर येथे शिक्षकांसोबत चर्चा केली. त्यात शिक्षकांनी मते मांडली. ‘विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल होत आहे आणि त्यावर चिंतन करणे गरजेचे आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये थेट शिवीगाळ करणे, एकमेकांना मोठ्याने हाक मारणे आणि वर्गात गोंधळ घालणे यांसारखे प्रकार वाढले आहेत. यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. वर्गातील बदलत्या वातावरणासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. आई-वडील दोघे नोकरीवर असणे, त्यांच्याकडे मुलांसाठी असलेला कमी वेळ, पालक कामानिमित्त ८-१० तास घराबाहेर असणे, मुलांच्या संगतीकडे दुर्लक्ष होणे या गोष्टी कारणीभूत आहेत. पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या मुलांमध्ये अभ्यासाची उमेद आणि पुस्तके वाचण्याची सवय अत्यंत कमी झाली आहे. विद्यार्थी मोबाइल हाताळतात म्हणजेच त्यांची बौद्धिक क्षमता कमी झालेली नाही, तर तिचा वापर चुकीच्या मार्गाने होत आहे’, असे निरीक्षण शिक्षकांनी नोंदविले.
चर्चेत मुख्याध्यापक प्रकाश नागरे, सुहास पाटील, प्रदीप विखे, प्रदीप मापारे, संभाजी देशमुख, ज्ञानेश्वर पाऊलबुद्धे, प्रशांत मेरत, योगेश पाटील, सविता भवरे, एस.एस. निकम, संगीता फलके, अनिता नागरे-जायभाये, स्वप्नाली मारवाडे, प्रांजल धाबेकर, सुवर्णा ढोंबरे यांनी भाग घेतला.
---
घरातील वातावरणाचा मुलांवर परिणाम
प्रांजल गरड म्हणाल्या, ‘‘प्रत्येक घरातील वातावरण हे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करते. विद्यार्थी मोबाइल ॲडिक्ट होत आहेत; कारण पालकही मुलांना वेळ देण्यापेक्षा मोबाइलवर अधिक वेळ घालवतात. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांना प्रत्येक गोष्ट ही सोपीच वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यातील शिक्षणाची उमेद कमी होताना दिसत आहे.’’
---
वाचनाची आवड वाढविणे गरजेचे
प्रदीप विखे यांनी नमूद केले, ‘‘गृहपाठ किंवा उदाहरणे सोडवण्यासाठी मुले पुस्तके वाचण्याऐवजी थेट मोबाइलचा वापर करतात. उत्तर न समजताच वहीत जसेच्या तसे उतरवले जाते. यामुळे विचार करण्याची क्षमता खुंटत आहे. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.’’
---
कुटुंबातील असुरक्षिततेचा मानसिक आरोग्यावर परिणाम
घरातील भांडणे, पालकांकडून मुलांना न मिळणारा वेळ आणि विभक्त कुटुंबपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. काही विद्यार्थी घरातून डबा न मिळणे, पालकांचे व्यसन यांसारख्या वैयक्तिक समस्या शिक्षकांकडे मांडतात. असुरक्षिततेमुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकटेपणा आणि न्यूनगंड तयार होतो. काही वेळा मुले स्वतःला इजा करून घेणे किंवा नशेच्या आहारी जाण्यासारख्या धोकादायक प्रवृत्तीकडे वळतात.
---
पालकांची भूमिका व भावनिक पक्षपात
सविता ढवळे यांनी एका प्रसंगाचा उल्लेख करताना सांगितले, ‘‘विद्यार्थ्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल पालकांना सांगताच त्यांनी आरोप नाकारले, मुलाला चार दिवस घरी ठेवले आणि वर्ग बदलण्याची मागणी केली. पालकांचा असा भावनिक पक्षपात मुलाचे नुकसान करतो. पालकांनी मुलाच्या चुका झाकण्याऐवजी दर ८-१० दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा शिक्षकांना भेटून परिस्थिती समजून घेतली पाहिजे.’’
---
शिक्षकांची हवी गृहभेट
मुख्याध्यापक प्रकाश नागरे म्हणाले, ‘‘मुलांमध्ये होणारे बदल हे शिक्षकांसोबतच पालकांच्याही लक्षात येतात. त्यामुळे दोघांमध्ये संवाद असणे गरजेचे आहे. आठवड्यातून किमान तीनवेळा पालकांनी शिक्षकांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरेल. अनेक वेळा मुले पालकांसोबत मनमोकळे बोलत नाहीत, तर शिक्षकांकडे आपल्या भावना व्यक्त करतात. त्यामुळे पालक-शिक्षक भेटीतून प्रश्न सुटू शकतो. कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणे किंवा कठोरपणे रागावणे यावर बंदी आहे. त्यामुळे शिस्त लावताना शिक्षकांना मर्यादा येतात.’’
---
रील्समुळे संयमाची कमतरता
मोबाइलमधील रील्स पाहण्याच्या सवयीमुळे मुलांचा संयम आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झाली आहे. शिवाय बाहेरील जंक/पॅकेट फूडमुळे मुलांमध्ये शारीरिक व मानसिक चंचलपणा वाढताना दिसत आहे, असे मत अनिता नागरे यांनी व्यक्त केले.
---
आत्मविश्वास वाढविणे गरजेचे
प्रशांत मेरत म्हणाले, ‘‘घरातील वातावरण चांगले नसेल आणि मुलांसोबतचा संवाद संपलेला असेल, तर ‘मला कोणी समजून घेत नाही’ अशी भावना निर्माण होते व अनेक वेळा टोकाचे पाऊल उचलले जाते. त्यामुळे मुलांना समजून घेऊन त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे.’’
----
शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण
शिक्षक ज्ञानेश्वर पाऊलबुद्धे यांनी शिक्षकांच्या प्रशासकीय अडचणींवर महत्त्वाचा प्रकाश टाकला. ‘‘निवडणूक, विविध प्रकारची सर्वेक्षणे, बीएलओची जबाबदारी, ऑनलाइन माहिती भरणे आणि विविध सरकारी ॲप्सवर काम करताना शिक्षकांचा बहुतांश वेळ निघून जातो. एका शिक्षकाला सकाळी ६:३० वाजता शाळेत येऊन शिकवावे लागते आणि सायंकाळी ७ ते ८ पर्यंत बाहेरील शासकीय कामे करावी लागतात. एका शिक्षकावर ३-४ विषय शिकवण्याची जबाबदारी असताना या अतिरिक्त कामांमुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचा प्रचंड ताण येतो’’, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
---