शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी
एक लाख रुपये मदत द्यावी
ठाकरे सेनेची तहसीलदारांकडे मागणी
पाथरी, ता.११ (बातमीदार) मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणा, रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावी, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेने (यूबीटी) तहसीलदारांकडे केली आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध सरकारांच्या काळात छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर २०१६ मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसह यापूर्वी झालेल्या बैठकीत परभणी जिल्ह्याच्या विकासासाठीही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, घोषणा होऊन अनेक वर्षांचा कालावधी उलटूनही अनेक कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. काही कामे कागदावरच असून काही कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला विकासाच्या घोषणांचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे (यूबीटी) ‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!’ या घोषवाक्याखाली १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मराठवाडाव्यापी जनआंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून विविध सरकारांनी केलेल्या विकासाच्या घोषणांपैकी किती कामे पूर्ण झाली किती कामे सुरू आहेत आणि किती कामे अद्याप रखडली आहेत, याचा वस्तुस्थितीदर्शक हिशोब जनतेसमोर मांडण्यात येत आहे. पावसाने एक-दीड महिन्यापासून ओढ दिल्याने पिके जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर सध्या आर्थिक संकट आले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी, आदी मागण्या नमूद केल्या आहेत.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनावर तालुकाप्रमुख हरिभाऊ वाकणकर, शहरप्रमुख रियाज खान यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
------------