पिके करपली; बाजारपेठेत उलाढाल मंदावली
हातात पैसा नसल्याने सणासुदीच्या खरेदीवरही परिणाम
कळंब, ता. १० (बातमीदार) : पावसाळ्याचे दिवस सरत चालले असतानाही तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी शेतशिवारातील पिकांची अवस्था केविलवाणी झाली असून, मोठ्या आशेने पेरणी केलेले सोयाबीन पीक आता अक्षरशः पालापाचोळा होण्याच्या मार्गावर आहे. उत्पादनाचीच चिंता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा फिरत नसून, त्याचा थेट परिणाम कळंब शहरातील बाजारपेठेवर झाला आहे. लाखो रुपयांची दैनंदिन उलाढाल मंदावली आहे.
कळंब तालुक्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. यंदा सुरवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली. अनेक ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडली आहेत.
पेरणी, बियाणे, खत, औषधांची फवारणी आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, पिकेच धोक्यात आल्याने हा खर्चही निघेल की नाही, अशी चिंता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दैनंदिन गरजांसह सणासुदीची खरेदीही पुढे ढकलली आहे. याचा परिणाम किराणा, कापड, कृषी साहित्य, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स तसेच अन्य छोट्या-मोठ्या व्यवसायांवर झाला आहे.
सणासुदीवरही संकटाचे सावट
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी यासारखे सण जवळ येत असताना बाजारपेठेत मोठ्या उलाढालीची अपेक्षा असते. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने नवीन कपडे, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, दुचाकी तसेच सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी पुढे ढकलण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे.
..............................
((कोट))
तालुक्यातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पैशावर चालते. यंदा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे किराणा खरेदीवरही मोठा परिणाम झाला असून, रोजची उलाढाल लक्षणीय घटली आहे. सणासुदीवरही आर्थिक संकटाचे सावट गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी यासारखे सण जवळ येत असताना बाजारपेठेत मोठ्या उलाढालीची अपेक्षा असते. मात्र शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने यंदाच्या सणासुदीच्या खरेदीवरही पावसाचे सावट आले आहे. नवीन कपडे, घरातील वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, दुचाकी, सोन्या-चांदीच्या वस्तू तसेच इतर खरेदी पुढे ढकलण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे.
- गुरुलिंग शिंगणापुरे, व्यापारी, कळंब
..............................
((कोट))
सणासुदीच्या काळात कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी असते; मात्र यंदा पिकांची परिस्थिती खराब असल्याने शेतकरी खरेदी पुढे ढकलत आहेत. पाऊस झाला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर बाजारपेठेलाही पुन्हा उभारी मिळेल.
- प्रकाश शिंदे, कापड व्यापारी, कळंब
..............................
((कोट))
सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या खरेदीला चांगली मागणी असते; मात्र यंदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच संकट आले आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम केवळ शेतावर नाही, तर संपूर्ण बाजारपेठेवर झाला आहे. पाऊस पडला तरच बाजारपेठेला उभारी मिळेल. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला तरच बाजारपेठेत खरेदी-विक्रीला वेग येतो. त्यामुळे सध्या कळंबच्या बाजारपेठेला पावसाची आणि शेतकऱ्यांना पिके वाचण्याची प्रतीक्षा आहे.
- वासुदेव वेदपाठक, सराफ व्यापारी, कळंब