गणपतीला २१ दुर्वाच का वाहतात?
गणपतीला दुर्वाच का प्रिय आहेत आणि २१ या संख्येलाच धार्मिक महत्त्व का दिले जाते, यामागे पौराणिक कथेसोबतच प्रतीकात्मक अर्थही जोडलेला आहे.
पौराणिक कथेनुसार, अनलासुर नावाच्या असुराने आपल्या प्रचंड उष्णतेने सर्वत्र हाहाकार माजविला होता. देव, ऋषी आणि सामान्य नागरिक त्याच्या त्रासाने हैराण झाले होते. त्यावेळी ‘गणपतींनी’ अनलासुराचा पराभव करून त्याला गिळून टाकले. मात्र, अनलासुराच्या उष्णतेमुळे गणपतीच्या शरीरातही प्रचंड दाह निर्माण झाला. विविध उपाय करूनही ही उष्णता कमी होत नव्हती. अखेर काही ऋषींनी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या. दुर्वांमुळे गणपतीच्या शरीरातील दाह शांत झाला, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे दुर्वा गणपतीला विशेष प्रिय असल्याची श्रद्धा रूढ झाली.
----
२१ संख्येचे महत्त्व
गणेशपूजेत २१ या संख्येला विशेष स्थान आहे. धार्मिक परंपरेनुसार शरीरातील विविध शक्ती आणि तत्त्वांचे प्रतीक म्हणून २१ दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे. भक्ती, शुद्धता, संयम आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक म्हणूनही दुर्वांकडे पाहिले जाते. त्यामुळे गणरायाला २१ दुर्वा अर्पण करून भक्त सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना करतात.
---
चैतन्य आणि समृद्धीचे प्रतीक
दुर्वा ही सहज उपलब्ध होणारी आणि वेगाने पुन्हा वाढणारी वनस्पती आहे. कितीही वेळा कापल्या किंवा तुडवल्या तरी त्या पुन्हा उगवतात. त्यामुळे दुर्वांना चैतन्य, दीर्घायुष्य, समृद्धी आणि संकटांवर मात करण्याचे प्रतीक मानले जाते. गणपतीला दुर्वा अर्पण करताना जीवनातील अडचणींवर धैर्याने मात करून पुन्हा उभे राहण्याचा संदेशही भक्त घेतात. गणेशपूजेसाठी स्वच्छ व ताज्या दुर्वा निवडून त्यांची तीन किंवा पाच पात्यांची जुडी केली जाते. ती गणरायाच्या चरणी किंवा मस्तकावर अर्पण करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी २१ जुड्या अर्पण केल्या जातात, तर काही कुटुंबांत २१ दुर्वा वाहण्याची प्रथा आहे.