फोकस -
खर्च वाढला, पण उत्साह कायम
हरेंद्र केंदाळे -
महागाई आणि वाढत्या दरांमुळे खर्चात वाढ झालेली असतानाही, घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात गणरायाचे आगमन यंदाही तितक्याच थाटामाटात झाले आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर, आकर्षक सजावट आणि जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिभावात न्हाऊन निघाले. महागाईमुळे खर्च वाढला, पण शहरवासीयांमध्ये उत्साह कायम होता.
बाजारातील भाव बघून अनेकांनी उत्सवाचे बजेट काहीसे आवरते घेतले. मात्र, उत्सवाचा आनंद कमी न करता खर्चाचे नियोजन बदलले. महागडी सजावट करण्याऐवजी घरच्या घरी तयार केलेली आरास, पर्यावरणपूरक साहित्य, स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी आणि गरजेपुरत्याच वस्तू घेण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवतानाच उत्सवाचा उत्साह कायम राहिला.
गणरायाच्या आगमनासाठी घराघरांत अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. स्वच्छता, रंगरंगोटी, मखराची उभारणी, फुलांची सजावट आणि पूजेच्या साहित्याची खरेदी यामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. अनेक कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली. काहींनी सामाजिक संदेश देणारी सजावट केली.
घरातील गणपती हा केवळ धार्मिक विधी राहिलेला नाही, तर कुटुंबाला एकत्र आणणारा उत्सव बनला आहे. नोकरी-व्यवसायामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले सदस्य गणेशोत्सवासाठी घरी एकत्र येतात. त्यामुळे या उत्सवाला भावनिक आणि कौटुंबिक महत्त्वही मोठे आहे. गणेशोत्सवामुळे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल झाली. गणेशमूर्ती, फुले, हार, सजावटीचे साहित्य, मखर, विद्युत रोषणाई, पूजेचे साहित्य, फळे, मिठाई यासह विविध वस्तूंना मागणी वाढली. महागाईमुळे दर वाढले असले तरी ग्राहकांनी आवश्यक खरेदी केलीच.
विशेष म्हणजे, मोठ्या दुकानांबरोबरच छोटे विक्रेते, फुलविक्रेते, मूर्तिकार, सजावट करणारे कारागीर, मंडप व्यावसायिक आणि घरगुती उद्योगांनाही उत्सवाचा हातभार लागला. गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असला तरी त्यातून स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळते, हे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनीही उत्सवाला सामाजिक आशय देण्याचा प्रयत्न केला. विविध विषयांवरील देखावे, जनजागृतीपर संदेश, आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान, वृक्षारोपण, गरजूंसाठी मदत अशा उपक्रमांमधून उत्सवाची व्याप्ती धार्मिकतेपलीकडे गेली. त्यामुळे गणेशोत्सव हा मनोरंजनासोबत समाजाशी जोडणारा उत्सव म्हणूनही पुढे येत आहे.
बजेट जुळवाजुळव
महागाईमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चाचे गणित बदलले आहे. अन्नधान्य, फळे, फुले, पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंचे दर वाढले असले तरी गणरायाच्या स्वागतासाठी प्रत्येकाने आपल्या परीने तरतूद केली. कुणी सजावटीवर खर्च कमी केला, कुणी पूजेच्या साहित्याची खरेदी नियोजनपूर्वक केली. तर कुणी घरच्या घरी प्रसाद तयार केला. उत्सवाचा खर्च कमी झाला असेल, पण उत्साह मात्र कमी झाला नाही.