((एक मेन))
........
ढोलविरोधातही आवाज वाढवा
डीजेमुक्तीसाठी प्रशासनाने उचलली पावले, नागरिकांचाही पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ५ : यंदाचा गणेशोत्सव ‘डीजेमुक्त’, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवात डीजेच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कानाचे पडदे फाडणाऱ्या दणदणाटापासून मुक्ती मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून त्यांनी डिजेबंदीला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, डीजेवर बंदी असली तरी सध्या सरावाच्या नावाखाली आणि मिरवणुकीत कोणत्याही परवानगीशिवाय वाजवल्या जाणाऱ्या अतिआवाजाच्या ढोल-ताशांवर मात्र कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता डीजेसोबतच ढोल-ताशांच्या दणदणाटावरही मर्यादेचे बंधन आणणे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात कठोर पावले उचलणे तितकेच गरजेचे आहे. गणेशोत्सवाचे पारंपरिक आणि सात्विक स्वरूप कायम ठेवण्यासाठी लेझीम, भजने व इतर स्थानिक सांस्कृतिक कलाप्रकारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी स्पर्धा
यंदाच्या उत्सवात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी तालुका स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरणपूरक व नियम पाळणाऱ्या उत्कृष्ट मंडळांसाठी स्पर्धांचेही आयोजन केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली. यासंबंधीचे अधिकृत परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
..............
((चौकट))
ध्वनिप्रदूषण हा कायद्याने अपराध
ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत अतिआवाजावर कारवाईची तरतूद आहे. सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) वाजवणे हा कोणत्याही धर्माचा किंवा सणाचा मूलभूत अधिकार नाही. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास ५ वर्षांपर्यंतचा कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, असे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अनिल पाटील यांनी सांगितले.
..........................
((कोट))
९० डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेच्या आवाजाच्या सततच्या संपर्कात राहिल्याने कायमस्वरूपी कर्णबधिरता (बधिरपणा) येऊ शकते. अतिआवाजामुळे केवळ कानांवरच नव्हे, तर हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये हृदयाची धडधड वाढणे, तीव्र अस्वस्थता, चिडचिड आणि निद्रानाश (झोप न येणे) यांसारखे गंभीर शारीरिक व मानसिक आजार उद्भवतात.
- डॉ. सचिन देशमुख, कान-नाक-घसा तज्ज्ञ, शासकीय रुग्णालय, धाराशिव
..........................
((कोट))
डीजेमुक्ती ही आवश्यकच आहे. ती नागरिकांसाठी त्रासदायक आहे. ढोलवादन पथकांत देखील ढोलच्या संख्येची मर्यादा घालणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या मंडळात गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ लेझीम पथकांचा वापर करतो.
- प्रा. भालचंद्र हुच्चे, मार्गदर्शक, बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली, धाराशिव
..........................
((कोट))
गणेशोत्सवातील डीजेचा वापर पूर्णपणे बंद होणे योग्यच आहे. मात्र, ढोलवादनाने डीजेच्या तुलनेने कमी ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे त्याचा वापर झाला तरी काही हरकत नाही.
- बाळासाहेब काकडे, धाराशिव
........
((पॉइंटर))
कायद्यानुसार आवाजाची कमाल मर्यादा (डेसिबलमध्ये)
शांतता क्षेत्र (शाळा, रुग्णालये, न्यायालये परिसर-१०० मीटर)
दिवसा : ५० dB | रात्री : ४० dB (हॉर्न व लाऊडस्पीकरला पूर्ण मनाई)
निवासी क्षेत्र :
दिवसा : ५५ dB | रात्री : ४५ dB
व्यापारी क्षेत्र :
दिवसा : ६५ dB | रात्री : ५५ dB
औद्योगिक क्षेत्र :
दिवसा : ७५ dB | रात्री : ७० dB
(टीप : दिवसाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० आणि रात्रीची वेळ १० ते सकाळी ६ अशी गृहीत धरली जाते. वर्षातील ठरावीक १५ सणांना रात्री १० ते १२ पर्यंत मर्यादित आवाजात लाऊडस्पीकर वापरण्याची मुभा असते, मात्र त्यासाठी डेसिबल मर्यादा पाळणे बंधनकारक आहे.)
........
((चौकट))
ध्वनिप्रदूषणाची तक्रार कुठे कराल
उत्सव काळात किंवा सरावादरम्यान मर्यादेपेक्षा जास्त आवाजाचा त्रास होत असल्यास नागरिक १०० किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर थेट संपर्क साधू शकतात. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संकेतस्थळावर किंवा मोबाइल ॲपवरही ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. तक्रारदाराची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते.